कृष्णेच्या खोऱ्यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते. कोणतेही कार्य करण्यापूर्वी एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या कृतीत विवेक सांभाळला तर यशप्राप्ती होते, असा समर्थांचा सिद्धांत आहे. समर्थांचे कार्य नि:स्पृहपणे चालले होते. त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थी विचार त्यांच्या मनात नव्हता.
आमची प्रतिज्ञा ऐसी ।
काही न मागावें शिष्यांसी ।
आपणामागे जगदिशासी ।
भजत जावें ॥ (दा. १२.१०.३४)
एवढीच माफक अपेक्षा ठेवून ते कार्य करीत होते. त्याबद्दल लोकांत प्रसिद्धीही त्यांना नको होती. आपले काम झाले की समर्थ जवळच्या डोंगरावरील एखाद्या घळीत निसर्गाच्या सान्निध्यात मुक्कामाला जात असत. मसूर हे सुरक्षित ठिकाण मिळाल्याने समर्थांनी इ. स. १६४५ साली पहिला रामनवमीचा उत्सव नऊ दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यामागे समर्थांचा काय उद्देश होता, याचा आढावा आपण मागील लेखात घेतला आहे. समर्थांनी मसूरला दोन-तीन उत्सव साजरे केले. पण, तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. कुठेतरी एखाद्या ठिकाणी रामाची मूर्ती कायमस्वरुपी स्थापून तिथे देऊळ बांधावे आणि तिथे रामनवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर व्हावा, अशी योजना समर्थांच्या मनात घोळत होती. त्यासाठी योग्य नेतृत्व व शिष्य तयार करायचे होते. नि:स्पृह माणसे पुढे आली, तर या धार्मिक परंपरा टिकून राहतील, याची समर्थांना कल्पना होती. मसूरच्या उत्सवात रामाची मूर्ती नव्हती, तेव्हा राममंदिर बांधण्यासाठी योग्य अशा जागेचा शोध समर्थ घेऊ लागले.
समर्थ रंगनाथस्वामींच्या भेटीस जाऊन निगडीहून परत येत असताना रहिमतपूरनजीक अंगापूरच्या जंगलात शिवनाथ म्हणून एक स्थान आहे. तेथे स्नान करून समर्थ ध्यानास बसले असता त्यांना शब्द ऐकू आले की, “तुम्हाला हवी ती मूर्ती या डोहात आहे.” समर्थांनी डोहात उडी घेतली व दोन हातात दोन मूर्ती घेऊन ते बाहेर आले. एक मूर्ती धनुर्धारी रामाची व एक महिषासूरमर्दिनीची होती. (संदर्भ जय जय रघुवीर समर्थ - ल. रा. पांगारकर) रामदासांच्या काही चरित्रकारांनी या कथेचा पुढील भाग सांगताना ती चमत्काराला जोडली आहे. रामदास त्या मूर्ती झोळीत टाकून चाफळच्या दिशेने निघाले. ते काही गुराखी पोरांनी पाहिले. त्यांनी गावात जाऊन बातमी दिली की, एक गोसावी आपल्या डोहातील मूर्ती काढून घेऊन जात आहे. काही प्रतिष्ठित लोकांनी पाठलाग करून समर्थांना वाटेत गाठले. ते म्हणाले, “मुसलमानांच्या भीतीने आम्ही त्या मूर्ती डोहात टाकल्या. त्या आमच्या गावाच्या आहेत. तुम्ही त्या परत करा.” समर्थ काही बोलले नाहीत. झोळीतील मूर्ती काढून त्यांनी तेथील गवतावर ठेवल्या व ते तेथून पुढे निघाले. इकडे मूर्ती गावात न्यायच्या म्हणून लोकांनी त्या उचलण्याचा प्रयत्न केला. पण, त्या तेथे घट्ट रुतून बसल्या होत्या. खूप प्रयत्न करूनही गावकर्यांना त्या मूर्ती हलवता येईना. अखेर धावत जाऊन ते समर्थांना शरण गेले व मूर्ती घेऊन जाण्यास सांगितले. समर्थांनी परत येऊन त्या मूर्ती सहजपणे उचलून झोळीत टाकल्या व त्यांना घेऊन ते चाफळला आले.
जागा मिळाली, मूर्ती मिळाल्या, आता मंदिर उभे करायच्या कामाला समर्थ लागले. त्यासाठी पैसेही मिळाले. पुणे येथे गिरीगोसावींचे कीर्तन शिवाजीने ऐकले. काही बिदागी देऊ केली. त्यावेळी त्या नि:स्पृह गोसाव्याने ते नाकारले व सांगितले की, “रामदास चाफळला श्रीरामाचे देऊळ बांधत आहेत. त्यांना मदत करावी.” त्यावेळी शिवाजीने चाफळचे मामलेदार नरसोमलनाथ यांच्या मार्फत तीनशे होन पाठवले. इतर शिष्यमंडळींकडूनही द्रव्य जमा झाले. अशा रीतीने रामाचे देवालय बांधले व त्यात राममूर्तीची व महिषासूरमर्दिनी मूर्तीची स्थापना केली. रामाची रथात उभी असलेली अशी मूर्ती आहे. प्रसिद्ध मूर्तिविज्ञान तज्ज्ञ व इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मते, ही मूर्ती सूर्यनारायणाची आहे. रथाचा सारथी मारुती नसून अरुण आहे. तथापि समर्थ रामदासांनी ती मूर्ती रामाची म्हणूनच स्थापन केली आहे. तेव्हा ती श्रीरामांचीच समजली पाहिजे. हनुमंतस्वामींच्या बखरीत अंगापूरच्या डोहातील मूर्ती बाहेर काढल्याचा शके १५६९ (इ.स. १६४७) व चाफळ उत्सवाची सुरुवात शके १५७० (इ.स. १६४८) असा उल्लेख आहे. ही वर्षे ‘वाकेनिसी’ टिपणाशी बरोबर जुळतात. चाफळच्या पहिल्या रामजन्मोत्सवाचे वर्णन समर्थांनी सुरेख केले आहे. त्याची सुरुवात…
‘भोवती डोंगरांचा फेर ।
मध्ये देवाचे शिखर ।
पुढे मंडप संपूर्ण । पंधरा खण ॥’
अशी आकर्षक आहे. आज साडेतीनशे वर्षे झाली तरी, चाफळचा उत्सव तसाच चालू आहे. समर्थांच्या इच्छाशक्तीचा तो प्रभाव आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/