गडचिरोली : हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. यामध्ये माहितीचा महाविस्फोट घडविण्याचं काम तंत्रज्ञानाने केलं आहे. तरीसुद्धा या माध्यमांच्या प्रवासामध्ये वृत्तपत्राचे स्थान अबाधीत आहे. म्हणूनच वृत्तपत्र हे समाज मनाचे माध्यम आहे. मात्र बदलत्या युगाप्रमाणे तंत्र अद्ययावत करण्याची वेळ आली आहे. माध्यमांसमोर ते नवे आव्हान आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले. गडचिरोली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रवासात असो किंवा घरात, वृत्तपत्र वाचन ही एक सवय बनली आहे. अशा अनेक पिढ्या आपणास दिसतात. त्यातही नवे वृत्तपत्र आपला स्वतंत्र असा वाचकवर्ग निर्माण करते आणि वाचक वर्गाच्या रुचीप्रमाणे आता वृत्तपत्रांनी पुरवण्यांच्या माध्यमातून युवक, महिला, मनोरंजन, आणि साहित्य तसेच आरोग्य, कृषी, तसेच विविध क्षेत्रांना स्पर्श करणारी माहिती द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वृत्तपत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शासनाच्या विकासात्मक योजना वर्तमानपत्राच्या माध्यमाने तळागाळातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. तरीपण बदलत्या काळाचा विचार करता ई-पोर्टल वृत्तपत्राद्वारे सामाजिक समस्यांना वाचा फोडणे ही काळाची गरज आहे.