अकोला : राज्यातील शेतकरी हा जेव्हा सुखी होईल, तेव्हाच राज्य आणि देश खऱ्या अर्थाने सुखी होईल. त्यामुळे कोणत्याही विकासकामांमध्ये तसेच नव्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य देणे हेच सरकारचे मुख्य धोरण आहे' असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. मुर्तिजापूर तालुकयातील विराहीत या गावात पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलच्या लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
'शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उद्देशाने सरकारने अनेक योजना सध्या अस्तित्वात आणल्या आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानामुळे राज्य २०१९ पर्यंत जलमय होणार आहे. शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे खारपाणपटयातील शेतकऱ्यांचे देखील जीवनमान उंचावणार आहे. सिंचन प्रकल्प, शाश्वत पाणी, शेतीला मुबलक वीज, शेतमालाला बाजार भाव या मुलभूत सोयी शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात तसेच शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे' असे ते यावेळी म्हणाले.
याच बरोबर सद्या विदर्भातील कापूस पिकांवर होत असलेल्या बोंडआळीच्या प्रदुर्भावावर भाष्य करत, त्यांनी उपस्थित नागरिकांना काही मार्गदर्शन केले. कापसावर बोंडअळीचे आलेले संकट कमी करावयाचे असेल तर जनजागृती होणे आवश्यक आहे, असे ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी बी.टी. कॉटन सोबत नॉन बी.टी. कॉटनची देखील पेरणी करावी व फेब्रुवारीपर्यंत शेत रिकामे करावे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होईल. व कपाशीचे उत्पादन योग्य प्रकारे होईल, असे ते म्हणाले.