#शक्तीपूजन - कहाणी पाच रुपयाच्या वडापाव मागील संघर्षाची, जिद्दीची...
29-Sep-2017
Total Views |
''नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो । षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा तप्तृ केले, कृपे करुनी हो ।'' असे बोल देवीच्या आरती मध्ये आहेत. नवरात्रौउत्सवातील आजच्या नवव्या दिवसानिमित्त अशाच प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांनी खाद्यप्रेमींना तृप्त करणाऱ्या वृंदा खाडिलकर-नवरे यांची कहाणी आपल्यासमोर मांडत आहोत. पुण्यात पाच रुपयाचा वडापाव हि संकल्पना ज्यांनी सुरु केली व रुजवली त्यांचा आत्तापर्यंतचा थक्क करणारा हा संघर्षमयी प्रवास...
वृंदा ही पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध डॉक्टर खाडिलकर यांची मुलगी. लहानपणीपासूनच ती प्रचंड महत्वाकांक्षी तितकीच हुशार व जिद्दी देखील. १२ वी पर्यंतचे शिक्षण 'कॉन्व्हेंट'मध्ये झाल्यानंतर पुढे बेकरी व्यवसायात काहीतरी करण्याचं वृंदाने आधीपासूनच मनाशी ठाम केलं होतं. त्यासाठी १२ मध्ये चांगले मार्क मिळूनसुद्धा 'फूड क्राफ्ट इन्स्टिटयूट'मध्ये तिने घरच्यांच्या मागे लागून व्होकेशन कोर्सला प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात मुलगी वयात आली आहे व तिने आता एक उत्तम गृहिणी व्हावं घरच्यांची इच्छा असल्याने त्यांनी लगेचच तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. स्थळांची पाहणी करताना पुण्यातील एक प्रतिष्ठित घराण्यामधूनही स्थळ आलं व ते होतं जेष्ठ लेखक शं. ना. नवरे यांच्या मुलाचं म्हणजेच मकरंद याचं. मुलगा बरंच शिकला होता, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर होता त्यामुळे खाडिलकर कुटुंबाला हे स्थळ आपल्या मुलीसाठी सर्वार्थाने परिपूर्ण वाटलं. १९८५ साली जेव्हा वृंदा अवघ्या साडेअठरा वर्षाची होती तेव्हा तिचे डॉक्टर मकरंद यांच्या सोबत लग्न झाले.
संसार सुरु झाला, आई-वडलांच्या इच्छेप्रमाणे 'उत्तम गृहिणी' या पद्धतीने सर्व काही सुरळीत चालू होते. वर्ष-दीड वर्षाने वृंदा व मकरंद यांना मुलगा देखील झाला. शंतनु असं त्याचं नामकरण झालं. आदर्श सुखाच्या मार्गावर असतानाच नियतीला कदाचित वृंदा यांच्या आयुष्यातील हे सुख बघवलं नाही आणि एक दिवशी एक दुर्दैवी बातमी कळली. डॉ. मकरंद यांना 'ब्रेनट्युमर' झाल्याचे एका तपासणीत निष्पन्न झाले. वृंदा यांच्या वर्तमानातील आणि भविष्यात मनात आखलेला तो सुखाचा डोंगर अवघ्या काही क्षणात कोसळला. सगळ्या बाजूने सगळे प्रयत्न झाले पण या असाध्य रोगावर मात करणे मकरंद यांना शक्य झाले नाही. अखेर जे नशिबात होते ते अनाकलनीय घडले व मकरंद यांनी १९९८ च्या सप्टेंबर महिन्यात अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी ते अवघ्या ३२ वर्षाचे, वृंदा अवघ्या २५ वर्षाच्या तर शंतनू केवळ पाच वर्षाचा होता. ऐन तारुण्यात वृंदा यांच्यावर कोसळलेलं हे संकट न पेलणार होतं, पण त्यांनी नशिबाशी लढायचं ठरवलं. सासर-माहेर दोन्ही कडूनही पुनर्विवाह करण्याचे प्रस्ताव वृंदा समोर मांडण्यात आले पण शंतनुच्या भविष्याचा विचार करून त्यांनी याला नकार दिला.
आयुष्याचा पुढचा प्रवास खरतर खूपच खडतर होता, पण वृंदा यांनी त्यावर मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. हे करण्यासाठी त्यांनी बेकरी व्यवसायाची निवड केली. १२वी नंतर केलेल्या व्होकेशन कोर्सचा त्यांना आत्ता उपयोग होणार होता. खाडिलकर व नवरे या दोन्ही परिवारात अशा प्रकारचा व्यवसाय कोणी केला नव्हता त्यामुळे वृंदा यांना सुरुवातीला दोन्हीकडून यासाठी थोडा विरोधच झाला. पण त्या जिद्द आणि आपल्या निश्चयावर ठाम असल्याने अखेर वडीलांनी पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या दवाखान्याची 'गोडाऊन'ची जागा बेकरी व्यवसायासाठी देऊ केली. चार कामगारांच्या साथीने वृंदा यांनी हा व्यवसाय सुरुवात केली.एकतर बाई माणूस आणि त्यात हा व्यवसाय त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, यातूनही मार्ग काढत त्यांनी वाटचाल चालू ठेवली. वर्ष-दोन वर्षांनी जरा चांगला प्रतिसाद मिळू लागला. पण वृंदा यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या त्या एवढ्यावरच समाधानी राहणाऱ्यातील नव्हत्या. त्यांनी त्यांचं पुढचं बेकरीचे दुकान पुण्यात काढायचे ठरवले. पण त्यासाठी भांडवल लागणार होतं. व्यवसायातील यश आणि स्वतःवर असणारा आत्मविश्वास या जोरावर वृंदा यांनी घरच्यांकडून काही ठराविक काळासाठी लाख रुपये घेतले व पाटील प्लाझा येथे पुण्यातील बेकरी सुरु केली. इथल्या दुकानामुळे चांगलाच जम बसला. 'ऑर्डर'ची संख्या वाढली. मग यातून मिळणार नफा वृंदा यांनी बाजूला टाकत हळूहळू घरच्यांकडून घेतलेले पैसे परत केले, इथे त्यांचा स्वावलंबी स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला. पुढे पुण्यात व्यवसाय चलतीच्या मार्गावर असतानाच एकदा ग्राहक पेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्याशी वृंदा यांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टची, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाची माहिती पाठक याना दिली व ग्राहक पेठेत असे एक दुकान सुरु करण्याचा प्रस्तावही बोलून दाखवला. योगायोगाने पाठक देखील त्यावेळी अशा 'फास्ट फूड'ची सेवा देणाऱ्या संस्थेच्या शोधात होते. वृंदा यांच्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने त्यावेळी यश मिळाले होते, कारण पुण्याच्या मध्यवर्ती परिसरात अशा प्रकारचा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळणे हे खरोखरीच सोन्यासारखेच होते.
हे सगळं जरी असलं तरी 'ग्राहक पेठेतील' दुकानात गुंतवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा पैशांच्या मुद्दा ऐरणीवर आला. यावेळी मात्र वृंदा यांनी घरच्यांकडून पैसे न घेते व्यावसायिक कर्जाला प्राधान्य दिले. टिळक रोडवरील जनता सहकारी बँकेत त्यांनी त्यासाठी प्रस्ताव दिला आणि विशेष काही दिवसातच या प्रस्तावाला मान्यताही मिळाली. मग काय एका नव्या ध्येयाने ग्राहक पेठ परिसरात 'वृंदाज फॅमिली फूड' हे नसून दुकान सुरु झालं. या परिसरातील शाळा-कॉलेजची संख्या पाहता वृंदा यांनी पदार्थांचे दर आवाक्यातील ठेवण्याचा निर्णय घेतला. 'हल्ली पाच रुपयात काही मिळतं का? आमच्या इथे बरंच काही मिळतं'' अशा आकर्षित टॅगलाईनने पुणेकरांचे मन जिंकले व त्यांना इथल्या सर्व पदार्थांची चवही आवडली. अल्पावधीतच 'वृंदाज फूड'ला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. इथे जाणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकालाच असा प्रश्न पडतो की पाच रुपयात इतके स्वादिष्ट पदार्थ, छोटे केक देणं यांना कसं परवडत असेल. तर याचाही उत्तर वृंदा यांनी दिलं आहे. त्या म्हणतात, ''आम्हाला माल काउंटर वर फार काळ राहत नाही. ग्राहकांची संख्या सातत्याने वाढतीच असल्याने पदार्थ पडून किंवा टाकून देण्याची वेळ येत नाही. त्यामुळेच एवढ्या कमी पैशात हे सगळॆ पदार्थ देणे आम्हाला परवडते.''
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ग्राहक पेठेतील या दुकानाला मिळालेला प्रतिसाद बघून वृंदा त्याच्याच आजूबाजूला आणखी एक गाळा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी देखील जनता सहकारी बँकेची त्यांना मदत झाली. नुसतं कर्ज स्वरूपातच नाही तर कॅश क्रेडीट सुविधा, गृहकर्ज, वाहन कर्ज या सगळ्यामधेच जनता बँकेने त्यांना वेळोवेळी तत्परतेने मदत केली. माझे स्वप्न, माझे विश्व, माझी ओळख मी जनता बँकेच्या भक्कम साथीमुळे आधारामुळे पूर्ण करू शकले, असं नमूद करायला वृंदा खाडिलकर नवरे विसरलेल्या नाहीत.
स्वप्न मोठे असो व छोटे, ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्या मध्ये असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला त्यांच्या पासून दूर ठेवू शकत नाही. हेच पुन्हा एकदा वृंदा यांच्या या प्रवासावरून लक्षात येतं. आज पुण्यात अनेक ठिकाणी पाच रुपयात वडापाव मिळतही असेल पण या संकल्पनेचं खरं श्रेय हे वृंदा यांनाच जातं. विशेष म्हणजे त्यांनी ही संकल्पना नुसती मांडली नाही तर योग्य सूत्र, नियोजनाच्या आधारे ती यशस्वी करून दाखविली. वेळोवेळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी, जनता बँकेनी दिलेली साथ तर मोलाची होतीच पण बेकरी व्यवसायात आपलं नावं कमवायचं हे त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीमुळेच पूर्ण झालं. आज दिवसाला हजारो ग्राहक त्यांनी तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांची चव आणि तेही केवळ याच रुपयात!!! वृंदा यांना याहून अधिक समाधान कदाचितच दुसऱ्या कोणत्या गोष्टीतून मिळत असावे...
----
वृंदा फॅमिल फूड व बेकरिना मध्ये उपलब्ध असलेले पदार्थ