
कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही, पण जिद्दीच्या जोरावर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो. पुणे शहरातील अशी अनेक उदाहरणं आजपर्यत आपण बघितली असती, पण विमल जाधव यांचं उदाहरणं खरोखरीच प्रेरणादायी आणि तितकच आव्हानात्मक देखील. नवरात्रो उत्सव २०१७च्या 'सीमोल्लंघन' सदरातील आमचा पुढचा लेख...
भावाला नोकरी लागली म्हणून ऐन तारुण्यात एक मुलगी आईला सोबत घेऊन पुण्यात येते. आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची तरीही भावाला मदत व्हावी यासाठी ही युवती पुण्यात आली. विमल असे तिचे नाव. शिक्षणाच्या नावाने सुद्धा तिची वानवाच होती. अशातही काहीतरी पैसे मिळावेत याकरिता विमलने एका हॉस्पिटलमध्ये पडेल ते काम करून नोकरी मिळवली. पुढे विमलच्या कामातला प्रामाणिकपणा लक्षात आल्याने तिला तिथे 'आया' म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच काळात दिनेश जाधव नावाचा एक तरुण छान-छान कपडे महागाच्या गाड्या घेऊन तिथे येत होता. विमल आणि दिनेशची सातत्याने भेट होत गेली व कालांतराने एकमेकांविषयी प्रेमही वाटू लागले. मग पुढे जे अनेकांच्या बाबतीत घडलं तेच विमलच्या वाट्याला आलं. दिनेश सोबत प्रेमविवाह झाल्यानंतर आयुष्याचे भीषण रूप समोर दिसू लागले. नवरा व्यसनी, गुन्हेगारी स्वरूपाचा निघाला. सासुरवाडीत दोन वेळेसच्या अन्नाचीही भ्रांत होती. अशा भीषण परिस्थितीत संसाराची सुरुवात झाली.

पण विमलताईंनी हार मानली नाही. याही परिस्थितीतून मार्ग निघेल असं ते स्वतःच्याच मनाला नेहमी सांगत राहिल्या. वेगवेगळ्या ठिकाणी छोटी-छोटी कामं करतं संसाराचा गाडा कसाबसा त्या हाकत राहिल्या. पण काम कितीही केलं तरी उदरनिर्वाह व्हावं एवढं उत्त्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे विमलताईंनी स्वतःच्या हिंमतीवर शुक्रवार पेठेत चहाची गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील प्रतिसाद फारच अत्यल्प होता आणि आवश्यक असणारी साधन सामुग्रीही पुरेशी नव्हती. पण तरीही विमलताईंनी माघार घेतली नाही. असंच एक दिवशी जवळील जनता सहकारी बँकेतील काही अधिकारी ताईंच्या हातचा चहा पिऊन गेले व त्यांना तो आवडला देखील. इथूनच त्यांच्या व्यवसायाला वेगळे वळण मिळाले. तिथे आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर विमलताईंनी जनता बँकेत सकाळ-संध्याकाळ सर्व कर्मचाऱ्यांना चहा पुरवण्याचे काम सुरु केले.

हळू हळू चहाची चव सगळ्यांनाच आवडली, बँकेशिवायही चहाच्या गाड्यावर येणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ होऊ लागली. पण अशा परिस्थितीत मोठे पातेले, चहाचे कप, इतर भांडी आदी सामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. या अडचणीच्या काळात पुन्हा एकदा जनता सहकारी बँक सचोटीने विमलताईंच्या पाठीशी आर्थिक स्वरूपात उभी राहिली. बँकेने ताईंना २५ हजार रुपयांचे कर्ज दिले व त्या पैशांच्या आधारे ताईंनी व्यवसायाचा विस्तार केला. शुक्रवार पेठेतच एक छोटासा गाला घेऊन तिथे चहाचा व्यवसाय जोमाने सुरु झाला. आता मात्र विमलताईंना नवी ओळख मिळाली. जनता बँकेत विमलताईंना 'चहावाल्या वाहिनी' म्हणून ओळखले जाऊ लागले.
विमलताई एवढ्यावरच समाधानी राहिल्या नाहीत तर त्यांनी नवीन दुकानातून चहा बरोबरच नाष्टा व पोळी-भाजीची सेवाही सुरु केली. आजमितीला विमलताईंच्या या व्यवसायाची आकडेवारी बघितली तर असं लक्षात येतं की, दिवसाला त्यांच्या कडून सकाळ संध्याकाळ १५० चहा विविध ऑफिसमध्ये दिले जातात तर ३५-४० लोकं रोज दोन वेळेस ताईंकडून पोळी-भाजी घेतात. या व्यवसायात गती मिळाल्यानंतर ताईंनी हाताखाली कर्मचारी ठेवले नाहीत. हा व्यवसाय अजूनही नवरा-बायको दोघंच मिळून सांभाळतात. ताई चहा बनवतात तर दिनेशजी तो बऱ्याच ठिकाणी नेवून देतात. या कामात त्यांचा मुलगा चारुदत्तही त्यांना मदत करतो. तो सध्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये रात्रशिक्षण घेत आहे. एवढाच काय तर ताईंनी डोणजे येथे स्वतःचे घरही विकत घेतले आहे.
विमलताईंच्या जीवनात एक काळ असा आला होता की तिथे दिवसही त्यांना सर्वत्र काळोख, अंधारच दिसायचा. पण या अंधारातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यांचा नवरा सुधारला, व्यवसाय यशस्वी झाला, मुलाचं शिक्षणही चालू आहे आणि घराचं स्वप्नं देखील पूर्ण झालंय. या संपूर्ण प्रवासात विमलताईंची सचोटी, जिद्द याला दाद द्यायलाच पाहिजे पण त्याबरोबरच जनता बँकेच्या निर्णयाचेही कौतुक केले पाहिजे. आज दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. 'एकात्म मानव दर्शन'मधून दीनदयाळजींनी 'अंत्योदयाचा मार्ग समाजासमोर मांडला होता. जनता बँकही दीनदयाळजींच्या याच संदेशावर पाऊल ठेवून काम करत असल्याचे लक्षात येत आहे. ज्याप्रमाणे सहजरित्या परतफेड करणाऱ्यांना जनता बँक कर्ज उपलब्ध करून देते त्याचप्रमाणे समाजातील विमलताईंसारख्या अंतिम घटकालाही आर्थिक पाठबळ देण्याचे धाडस बँकेमार्फत केले जाते. आजच्या जयंतीदिनानिमित्त बँकेच्यावतीने अअशाच अनेक 'विमलताई' उभ्या रहाव्यात इतकीच इच्छा!