#शक्तिपूजन - दुचाकी डीलर ते चित्रपट निर्माती 

    22-Sep-2017
Total Views | 14



महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याने आजपर्यंत अनेक अर्थानी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. हे वेगळे पण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक  तसेच चित्रपट क्षेत्रात उठावदारपणे दिसते. परंतु या जिल्ह्यातून मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये येऊन स्थायिक झालेल्या व आपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या महिलांची उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच सापडतील. याचं उदाहरणांमध्ये अश्विनी रणजीत दरेकर हे नाव सध्या प्रकर्षाने समोर येत आहे. 
 
नगरमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अश्विनीताईंनी उच्च शिक्षणासाठी थेट पुणे गाठले. पुण्यातील स. प. महाविद्यालयातून कला शाखेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच म्हणजे २००५ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असली तरीही स्वावलंबी बनायचं हा निश्चय मात्र त्यांचा ठाम होता. त्यामुळे यजमानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दुचाकी डिलरशिप घेण्याचा निर्णय घेतला. उद्दिष्ट पक्क होतं, घरच्यांची साथही होती पण दुचाकीची डिलरशिप घ्यायची म्हणजे मोठे आर्थिक पाठबळ लागणार होते. बऱ्याच ठिकाणी आर्थिक पाठबळासाठी प्रयत्न केल्यानंतर साधारण २००७-०८ च्या सुमारास जनता सहकारी बँकेने अश्विनीताईंच्या दुचाकी शोरूमच्या कर्जासाठीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळेच स्वावलंबी होऊन त्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करणे शक्य झाले. जनता बँकेच्या टिळक रोड शाखेसमोरच अश्विनीताईंच्या दुचाकीच्या पहिल्या शोरूमची सुरुवात झाली. 
 



त्यानंतर हळूहळू व्यवसायाची वृद्धी होत गेली व जनता बँकेच्या सातत्याने दिलेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर टिळक रोडवर अश्विनीताईंनी दुचाकीची दोन स्वतंत्र शोरूम चालू केली. एकीकडे व्यवसायात जम बसत होता मात्र दुसरी कडे मुलं मोठी होत असल्याने त्यांनाही अधिक वेळ देणं महत्वाचं होतं. त्यामुळे अश्विनीताईंनी एक वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. ज्यामधून त्यांना कुटुंबाला वेळही देता आला व समाजासाठी काहीतरी भरीव काम केल्याचं समाधानही मिळालं. फक्त पैसे कमविणे हा त्यांचा कधीच मूळ उद्देश नव्हता; मूळ उद्देश हा होता की, समाजातल्या गहन विषयांवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भाष्य करायचं. एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत असा विषय पोहचण्यासाठी चित्रपट हे एकमेव प्रभावी माध्यम त्यांच्या डोळ्यासमोर आलं आणि त्यांनी निर्माती म्हणून या क्षेत्रात येऊन काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. 'रेगे' हा अश्विनीताईंनी निर्मित केलेला पहिला चित्रपट. ''तुमच्या मुलाकडे तुमचं 'नीट' लक्ष आहे का?'' असा प्रश्न विचारातच हा चित्रपट आपल्याला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतो. 'रेगे' प्रदर्शित झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातून त्याला वाहवा मिळाली. सामाजिक भान राखत काहीतरी वेगळं देण्याचा अश्विनीताईंचा पहिला प्रयत्न 'रेगे'च्या निमित्ताने यश्वस्वी झाला. 'एआरडी एंटरटेनमेंट' असं त्यांच्या संस्थेचं नाव आहे. 
 

 
त्यानंतर त्यांनी 'पोरबझार' हा दुसरा मराठी चित्रपट निर्मित केला. याही चित्रपटाचा विषय 'टिनेजर्स' संदर्भातच होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक चालला नाही, परंतु चित्रपटाच्या विषयाची चर्चा मात्र सर्वत्र झाली. आता आगामी काळात बूट पॉलिश करणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर आधारित असणारा अरुण साधू यांच्या कादंबरीवरील 'झिपऱ्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याही चित्रपटाची निर्माती म्हणून अश्विनीताई पुन्हा आपल्यासमोर येत आहेत. अशा विषयांवरील चित्रपट अधिकाधिक प्रमाणात प्रदर्शित व्हावेत अशी अश्विनीताईंची मनोमन इच्छा आहे, परंतु पुन्हा एकदा सगळा विषय आर्थिक गणितांपाशी येऊन ठेपतो. त्यामुळेच त्यांच्या मते इतर क्षेत्राप्रमाणेच चित्रपट क्षेत्रासोबतही जनता सहकारी बँकेने उभे राहिल्यास अशा विषयांना, चित्रपटांना अधिक चालना मिळू शकते. चित्र माध्यमांना कर्ज देण्याची पद्धत फार प्रचलित झाली आहे असं वाटत नाही, पण येत्या काळात असं घडलं तर नक्कीच चांगल्या कलाकृतींना समाजासमोर आणता येणे शक्य होईल, असंही अश्विनीताईंनी बोलताना नमूद केलं. 
 
अरुण साधू याचं नुकताच निधन झालं. 'झिपऱ्या' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी साधू यांचे निधन झाल्याने निर्मात्या या नात्याने अश्विनीताई यांनी हळहळ व्यक्त केली. तसेच चित्रपट निर्मितीवेळेसचे काही अनुभवही नमूद केले. 

एकूणच काय तर चित्रपट क्षेत्र हे पैसा कमावण्याचं माध्यम असतानाही केवळ आपला मूळ उद्देश उराशी बाळगत सलग तिसऱ्या चित्रपटाची निवड करतानाही अश्विनीताईंनी सामाजिक विषयालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. हेच अश्विनीताईंमध्ये दडलेलं 'शक्तीस्थान' आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच या सदरातील दुसऱ्या लेखासाठी आम्ही त्यांच्या कार्याची निवड केली. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121