ऐंशीचे दशक साधारण संपत आले होते. मराठी चित्रपटांसाठी नव्या उमेदिचा हा काळ सुरू झाला होता. दादा कोंडके, रमेश देव, राजा गोसावी यांसारख्या मातब्बर कलाकारांकडून या क्षेत्राची धूरा तरूण पिढीकडे सोपविण्यात येत होती. यामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, अजिंक्य देव, प्रशांत दामले यांसारख्या नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश होता. याच काळात म्हणजेच 1988 साली रमाकांत कवठेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याकाळी या चित्रपटाने किती रूपये कमाविले आणि किती पुरस्कार मिळविले याच्या तपशीलात न जाता या चित्रपटाने मराठी सृष्टीला व प्रेक्षकांना कोणत्या गोष्टी दिल्या यावर आज भाष्य करणं अधिक गरजेचे आहे.
कळस लोकप्रियतेचा!
तसं मराठी चित्रपटांसाठी कौटुंबिक आणि धार्मिक विषय पहिलेपासूनच अधिक जिव्हाळ्याचे ठरत आले होते. कारण प्रेक्षकांना जे अधिक बघायला आवडतं ते देण्याचा या चित्रपटांनी प्रयत्न केला. याच धार्मिक विषयाचा आधार घेत राम कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाची कथा महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणार्या विठोबारायाच्या भोवती गुंफली. एका छोट्याशा गावातील वर्षानुवर्ष विठोबावर निस्सिम भक्ती करणारा सेवेकरी, त्याउलट नास्तिक असणारी त्याची बायको, या दोघांमधील सुवर्णमध्य साधायचा सतत प्रयत्न करणारी त्यांची तरूण मुलगी व त्या गावातील तीन लबाड तरूण अशी या चित्रपटातील प्रमुख पात्र होती. ही पात्र बाळ धूरी, जयश्री गडकर, अशोक सराफ, राजा गोसावी यांनी बखुबी निभावली पण या सगळ्यांपेक्षा अधिक भाव खाऊन गेला तो या चित्रपटात बाल कलाकाराची भुमिका वठविणारा बकुळ कवठेकर! बकुळने साकारलेली विठोबाची भूमिका खरतर खूपच अवघड होती कारण ही भूमिका अबोल होती. त्याला जो काही अभिनय करायचा होता तो केवळ त्याच्या हावभावातून आणि त्याच्या देहबोलीतून. पण या सगळ्यात तो कुठेच कमी पडला नाही. अगदी अल्लड, निरागस परंतु तितकाच अवलिया विठोबा बकुळने पडद्यावर इतक्या सशक्तपणे साकारला की, ज्या ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला असेल त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी किमान एकदातरी या व्यक्तिरेखेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही! त्यानंतर बकुळ फार चित्रपटांमध्ये दिसला नाही. पुढे पुण्यातील भारती विद्यापिठात ‘फाईन आर्ट’च शिक्षण घेत असताना ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने 2002 साली बकुळचा अकस्मित मृत्यु झाला. आज बकुळ असता तर तो नक्की काय करत असता माहित नाही, पण त्याच्यारूपाने आपण एक चांगला ‘कलाकार’ गमविला याच दु:ख मात्र नक्कीच सलत आहे.
मला आजही आठवतयं की अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत दर आषाढी एकादशीला सह्यांद्री वाहिनीवर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन दाखविला जायचा. वारीचा अनुभव, पांडुरंगाची भक्ती आणि त्यातच या चित्रपटाची साथ यामुळे तमाम महाराष्ट्रवासीय न चुकता यामध्ये तल्लीन व्हायचे. माझ्या पिढीतल्या आजच्या प्रत्येक तरूणाने हा चित्रपट पाहिलाच असेल. भलेही तेव्हा तो फार धार्मिक किंवा कधीकधी कंटाळवाणा वाटत असला तरी त्या चित्रपटाची पारायणं आपण सर्वांनीच केली आहेत. एक सूत्रबद्ध कथेची मांडणी, कॅमेराचा प्रगल्भ वावर, वारकर्यांचे टिपलेले हावभाव, पंढरपूरातील व वारीतील वातावरण आणि सर्वच अभिनेत्यांचा दिलखुलास अभिनय यामुळे हा चित्रपट परत परत पाहावा वाटायचा. या चित्रपटातलं ‘धरीला पंढरीचा चोरं’ हे गाणं गेल्या कित्येक वर्षांपासून आजतागायत अनेकांच्या मनात स्थान करून आहे. आज पुन्हा एकदा आषाढी एकादशी आलीये, पण आता हा चित्रपट अपवादानेच कुठल्यातरी वाहिनीवर बघायला मिळतो. हा लेख वाचणार्यांपैकी अजूनही कोणी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट बघितला नसेल तर खास त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटाची लिंक सोबत जोडली आहे.
विठ्ठलावरील प्रेम वाढले...
या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मराठी चित्रपट सृष्टीचं विठ्ठलावरील प्रेम अधिकच वाढलं. दरम्यानच्या काळात राम गबाले यांचा ‘ही वाट पंढरीची’, मिलिंद स्वामी यांचा ‘माहेर माझे हे पंढरपूर’ किंवा यशवंत भालकर यांचा ‘राजा पंढरीचा’ हे चित्रपट येऊन गेले. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील फारशे चालले नाहीत व नंतर वाहिन्यांवर प्रदर्शित झाल्यावर सुद्धा त्यांना लोकप्रियता मिळविता आली नाही. त्यामुळे केवळ ‘विठ्ठल’ किंवा ‘पंढरपूरची वारी’ हा विषय केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट बनविले तर ते चालतील, हा समज फोल ठरला. त्याला चांगला आशय, कथा व अभिनयाची जोड लागणारच हे चित्रपट निमार्त्यांना कळून चुकले.
नवयुगात पुन्हा अवतरला विठ्ठल...
मध्यंतरीचा बराच काळ हा विठ्ठल व वारीच्या विषयांपलीकडील सिनेमांचा होता. या काळात निर्मात्यांनी गणरायाला साकडे घातल्याचे दिसून येत होते. पण गेल्या सात-आठ वर्षात नव्या फळीतील कलाकार-दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा विठ्ठलाकडे आपला मोर्चा वळविला. अजित भैरवकर दिग्दर्शित व चिन्मय मांडलेकर अभिनित ‘गजर’ हा चित्रपट या नव्या ‘विठ्ठल युगात’ अधिक उठावदार झाला होता. कारण या चित्रपटाची मूळ कथा आजच्या तरूणाईशी जोडण्यात आली होती व त्याला वारीचे आणि विठ्ठल भक्तीचे संदर्भ दिले होते. हा चित्रपट कलेक्शनच्या दृष्टीने फेल ठरला मात्र त्याने प्रेक्षकांची तसेच समीक्षकांची वाहवा मात्र जरूर मिळविली. यानंतर विठ्ठलाला प्रथमच एका मसालापटात स्थान मिळाले. निशिकांत कामत तसा वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक व लेखक म्हणून ओळखला जातो पण त्याने रितेश देशमुखला सोबत घेऊन ‘लै भारी’ सारखा तद्दन मसालापट काढला आणि या चित्रपटात ‘माऊली’ पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले. त्यावेळी या चित्रपटाने मराठीतील सगळे विक्रम मोडीत काढत प्रचंड पैसे कमविले. पण आशयाच्या दृष्टीने विचार केल्यास या चित्रपटाने तसे फार काही विशेष आपल्याला दिले नाही.
अगदी अलिकडेच ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट येऊन गेला. परेश मोकाशीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या नावातूनच तेचे वेगळेपण दिसून येत होते. याचे संपूर्ण चित्रिकरण पंढरपूरात झाले असून संपूर्ण चित्रपट विठ्ठल किंवा वारी या विषयावर आधारित नसला तरी चित्रपटातील मोक्याच्या क्षणी वरील दोन विषयांना लेखक-दिग्दर्शकाने केलेला स्पर्श प्रेक्षकांना नक्कीच सुखावून जाणारा आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, मांडणी आणि विशेष करून बालकलाकारांचा अभिनय या जोरावर हा चित्रपट दोन्ही अर्थानी लोकप्रिय ठरला.
या विषयातलं अखेरचं अगदी ताज उदाहरण म्हणजे ‘रिंगण’. वर वर पाहता हा चित्रपट संपूर्णपणे विठ्ठल किंवा पंढरपूर, वारी या विषयावर आधारित असल्यासारखे वाटते. पण तरूण व नवखा दिग्दर्शक मकरंद माने याने कथा गुंफताना अगदी हुशरीने विविध विषयांना हात घातला आहे. अर्ध्याहून अधिक चित्रिकरण पंढरपूरात झालं असलं तरी या चित्रपटाने खुप कमी वेळा थेट विठ्ठलाच्या विषयाला स्पर्श केला आहे. नकळतपणे त्याने धार्मिक अंगाने पण वास्तववादी विचार करत हे ‘रिंगण’आपल्या समोर सादर केले आहे. या चित्रपटाला 63व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. आषाढी एकादशी किंवा यापुढील काही दिवसांचे औचित्य साधून तुम्ही हा चित्रपट एकदातरी आवश्य पाहावा!
विठ्ठल किंवा वारीवर आधारित असणारे या लेखात उल्लेख केलेल्या चित्रपटांशिवायही काही चित्रपट प्रदर्शित झाले असतील किंवा पुढील काळात होतीलही परंतु ‘पंढरीची वारी’ या चित्रपटासारखी लोकप्रियता आजपर्यंत तरी कोणाला मिळविता आली नाही. आगामी काळात ‘पंढरीची वारी’चं हे गारूड अधिक गडद होईल का, काळानुरूप या विषयावर येणारे चित्रपट आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण करतील हे येणार काळच ठरवेल. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल ऽऽऽऽऽ माऊली माऊली ऽऽऽऽऽऽ !!!