मी आतापर्यंत तीन वेळा इस्राइलला गेलोय. तीन्ही वेळा तीन वेगवेगळ्या मार्गांनी. एकदा लंडनमार्गे, एकदा पॅरिसमार्गे तर तिसऱ्यांदा इस्राइलच्या शेजारील राष्ट्र जॉर्डनमार्गे. जॉर्डनची राजधानी अम्मान येथून रॉयल जॉर्डन एअरलाइन्सच्या त्या छोट्या विमानातून केवळ ४० मिनिटांच्या छोट्या काळात मी इस्राइलला पोहोचलो. मला खिडकीची जागा मिळाली होती, तसेच विमान छोटे असल्याने थोडे खालूनच उडत होते. आसमंत स्वच्छ होतं. मळकट, तपकिरी आणि भुरकट रंगाचे अथांग वाळवंट खाली पसरलेले होते. पायलटने घोषणा केली, "थोड्याच वेळात विमान खाली उतरणार आहे." आणि मी खाली बघितलं. खालंच दृश्यच बदललेलं होतं. मळकट रंगाची जागा आता हिरव्या रंगाने घेतली होती. हिरव्या रंगाच्या अनेक छटा खाली पसरलेल्या होत्या.
वाळवंट तर तेच होतं मात्र जॉर्डनमधून जसे इस्राइलला स्पर्श केले, तसा मातीने रंग बदलायला सुरुवात केली. ही होती इस्राइलची, जादू- इस्राइलच्या मेहनतीची जादू, त्यांच्या हिंमतीची जादू. वाळवंटात शेती करणारा इस्राइल आज संपूर्ण जगात शेतीचे सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान निर्यात करत आहे. रोज लाखों टन फुलं आणि भाज्या यूरोपला पाठवत आहे. आज संपूर्ण जगाने ज्या 'ड्रिप इरिगेशन सिस्टिम' (ठिबक सिंचन) ला आत्मसात केले आहे, ती प्रणाली देखील इस्राइलनेच जगाला दिली आहे.
इस्राइल प्रतीक आहे स्वाभिमानाचे, आत्मविश्वासाचे आणि आत्मसन्मानाचे
इस्राइलची जनसंख्या केवळ ८० लाख. तीन ते चार तासात देशातील या भागापासून त्या भागापर्यंतची यात्रा आरामात संपन्न होऊ शकते. येथे पाण्याची उपलब्धता केवळ २%. प्राकृतिक स्रोतांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकीच. देवाने या देशावर जरा अन्यायच केला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आजूबाजूच्या अरब देशांमधून भल्या मोठ्या प्रमाणात तेल निघतं, मात्र इस्राइलमध्ये तर ते ही नाही.
इस्राइल हे राजकीय जीवंतता आणि राजकीय समजूतीच्या पराकाष्ठेचा देश आहे. या छोट्याशा देशात एकूण १२ राजकीय पक्ष आहेत. मात्र आज पर्यंत कुठलाच पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेला नाही. परंतु इस्राइलचे एक वैशिष्ट्य आहे, "देशाची सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान आणि देशहितावर या सर्व १२ पक्षांचे एकमत आहे." या मुद्यांवर कुठलाही पक्ष वाद घालत नाही, आणि सरकार पाडण्याची धमकीही देत नाही. इस्राइलचा स्वत:चा एक 'नॅशनल अजेंडा' आहे, आणि त्याचा सन्मान सर्व पक्ष करतात.
१४ मे १९४८ रोजी इस्राइलची स्थापना झाली. जगभरातील सर्वच देशांमधून यहूदी (ज्यू) समाजातील लोक इथे आले. आपल्या भारतातून देखील 'बने इस्राइल' या समुदायातील अनेक लोक इस्राइलला स्थलांतरित झाले. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या लोकांच्या भाषा देखील वेगवेगळ्या होत्या. आता प्रश्न उपस्थित झाला की संपूर्ण देशाची 'एकच' भाषा कुठली असेल? त्यांची स्वत:ची हिब्रू भाषा गेल्या २ हजार वर्षांपासून मृत्युशैय्येवर होती. अगदी तुरळक लोकांनाच हिब्रू भाषा माहीत होती. या भाषेतील साहित्य देखील खूपच कमी होते. नवीन साहित्याचा निर्माण देखील झाला नव्हता. कुणीतरी सल्ला दिला, "इंग्रजीला देशाची राष्ट्रभाषा घोषित करु." मात्र स्वाभिमानी ज्यू नागरिकांना ते काही सहन झाले नाही. "आमची हिब्रू भाषाच या देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली जाईल." असा निर्णय इस्राइलने घेतला.
निर्णय तर झाला मात्र व्यावहारिक समस्या पुढे आ वासून उभ्या होत्या. अत्यंत थोड्या लोकांना हिब्रूचे ज्ञान होते. त्यामुळे इस्राइल सरकारने केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत हिब्रू भाषा शिकवणारा पाठ्यक्रम तयार केला. आणि इथून सुरुवात झाली जगभरातील सगळ्या मोठ्या "भाषा अभियानाला". हे अभियान पुढे ५ वर्ष सुरु राहिले.
या अभियानांतर्गत संपूर्ण इस्राइलमध्ये ज्या कुठल्या व्यक्तीला हिब्रू भाषेचे ज्ञान होते, त्याने आपल्या घराजवळील शाळेत जाऊन सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात हिब्रू शिकवण्याचे कार्य करायचे. याने लहान मुलांना तर ५ वर्षात हिब्रू येईल. मात्र मोठ्यांचं काय ? या प्रश्चाने उत्तर देखील सोपे होते. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळात आपल्या आई वडिलांना आणि आजू-बाजूच्या वडिलधाऱ्या व्यक्तींनी हिब्रू शिकवायचे. त्या लहान मुलांनी शिकवण्यात चूक केली तर ? जे की स्वाभाविक होते. इस्राइल जवळ असलेला 'हिब्रू पाठ्यक्रम' या प्रश्नाचे उत्तर होते. ऑगस्ट १९८४ ते मे १९५३ या काळात दररोज या पाठ्यक्रमाचे वाचन रेडियोच्या माध्यमातून केले जाई. ज्या ठिकाणी लहान मुले चुकायची, वडीलधारी माणसे रेडियोच्या माध्यमातून ती चूक दुरुस्त करायचे.
आणि केवळ ५ वर्षाच्या काळात १९५३ मध्ये जेव्हा हे अभियान संपले, त्यावेळी संपूर्ण इस्राइलमध्ये हिब्रूची सारक्षता १००% होती.
आज हिब्रूमध्ये अनेक शोध प्रबंध लिहिले गेले आहेत. या छोट्याशा देशात इंजिनीअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण देखील हिब्रू भाषेतच देण्यात येते. इस्राइलला समजून घेण्यासाठी बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांना हिब्रू भाषेचे शिक्षण घ्यावे लागते.
हे आहे इस्राइल, जीवंतता, जिजीविषा आणि स्वाभिमानाचे जीवंत प्रतीक. अशा राष्ट्राच्या भेटीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जात आहेत. भारतातर्फे इस्राइल दौऱ्यावर जाणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.
आपण सगळ्यांसाठी ही निश्चितच एक ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांचा हा दौरा भारताच्या दृष्टीने नक्कीच महत्वाचा आहे.
- प्रशांत पोळ