शनिवारी (15 जुलै) पत्रकार परिषद दुपारी १२.३० वाजता सुरू होणार होती आणि मी १. १५ पर्यंत ऑफिसमध्येच होतो. म्हणूनच घाई गडबडीने ऑफिसमधून निघालो. पत्रकार परिषदेचे स्थळ साधारण ऑफिसपासून अर्ध्यातासाच्या अंतरावर. कसाबसा जलद पद्धतीने त्याठिकाणी पोहचलो. तिथे पोहचल्यावर मात्र भ्रमनिरासच झाला. पत्रकार परिषद होती मधुर भांडारकर यांची. भांडारकर हे हिंदी चित्रपट सृष्टीतलं मोठ नावं. पण हे नाव नेहमीच चर्चेचा विषय असतं. एकवेळ मधुरची सावली त्याची काही काळापुरती साथ सोडले पण ‘कॉन्ट्राव्हर्सी’ (वाद) आणि मधुरचे नाते अतुट, असं विनोदाने म्हटलं जातं. पण हे त्यादिवशी प्रत्यक्षच अनुभवायला मिळालं. तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की, ‘इंदु सरकार’ या मधुर भांडारकरच्या आगमी चित्रपटाला विरोध म्हणून पुणे शहर काँग्रेसच्या नेत्यांनी ही पत्रकार परिषद रद्द करण्यास भाग पाडली. या आधी चित्रपटांच्या प्रदर्शनाला विरोध करणार्या अशा अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत, त्यामुळे ही बाब फारशी नवीन नाही; पण यंदा जे विरोध करत आहेत ते जरा जास्तच घाबरले असल्याचे दिसून येत आहे.
Congress workers hv barged in the Hotel lobby & created ruckus,me & team are stranded like hostages in hotel room. #pune activity cancelled. pic.twitter.com/6GHX1VHGD8
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 15, 2017
Protests in Nagpur as the team lands there for promotion #InduSarkar pic.twitter.com/iTVwAO4W6w
— Indu Sarkar (@InduSarkarMovie) July 16, 2017
नक्की काय आहे इंदू सरकार?
मधुर भांडारकरने याआधी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. वेगवेगळ्या विषयांवर बोचरी टिका करणारे, वेळप्रसंगी त्या क्षेत्रातील अनेक गुपीतं उघड करणारे चित्रपट त्यांनी आपल्याला दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा असा एखादाच चित्रपट असेल की, तो वादाच्या भोवर्यात अडकला नाही. आता याच वादग्रस्त चित्रपटांच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट होतयं ते म्हणजे ‘इंदु सरकार’. ‘इंदु’ नावाच्या एका सामान्य संसारिक स्त्रीच्या आयुष्याबद्दल व तिच्या संदर्भाने घडणार्या घटनांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. पण यामधला जो काळ आहे तो आणीबाणीचा आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पुकारलेल्या आणीबाणीची पार्श्वभूमी या चित्रपटाला असून त्यानंतरच्या काळात संजय गांधी यांनी लावून धरलेला नसबंदीचा विषय व त्याला सामान्य वर्गातून घालेला विरोध या सगळ्याचा सारांश देखील ‘इंदू सरकार’मध्ये आपल्याला दिसून येणार आहे. या सगळ्या गोष्टी चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर आपसुकच लक्षात येतात.
या गोष्टींना होतोय प्रखर विरोध
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्याच जास्त विरोध झाला तो म्हणजे या ट्रेलर मधील एका संवादाला. ‘...और तुम लोग जिंदगी भर माँ-बेटे कीं गुलामी करते रहोंगें’ असा संवाद चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणार्या इंदूच्या तोंडी देण्यात आला आहे. खरतर याच संवादाने काँग्रेसी नेते, कार्यकर्ते व समर्थक पेटून उठले. त्यांच्यातली ही आग शमती न शमती तोच ‘चढता सुरज धीरे धीरे’ हे त्यावेळेसच्या सरकारला चपराक मारणारं चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं. इथूनच काँग्रेसी लोकांनी ‘इंदू सरकार’ विरोधातला संघर्ष अधिक प्रखर केला. सुरूवातीला़ हा विरोध सोशल मीडियावरूनच होत होता. ज्योतिरादित्य सिंधीया, राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या मोठ्या नेत्यांनी चित्रपटाला विरोध दर्शविला आणि नंतर हा विरोध वार्यासारखा पसरत गेला. कोणी म्हणायला लागलं मधुरच्या तोंडाला काळ फासणार्यांना मी एक लाख बक्षीस देणार तर कोणी म्हणातयं प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवा... आता गेल्या दोन दिवसात तर विरोधाला अधिक धार प्राप्त झाली असून पुणे व नागपूरमधील नियोजित पत्रकार परिषदाचा काँग्रेसच्या लोकांनी रद्द केल्या. एकूणच हे सगळं वातावरण पाहता मनात प्रश्न पडतो की, ही काँग्रेसी लोकं नेमकी कोणत्या गोष्टीला घाबरत आहेत. त्यावेळी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी किंवा संजय गाधींनी जे निर्णय घेतले ते मधुरने जसेच्या तसे मांडले आहेत आणि मधुरच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट 30 टक्के सत्यघटनेवर तर 70 टक्के काल्पनिक कथेवर आधारीत आहे.
खरच, भय इथले संपत नाही...
मोदी सरकार सत्तेवर आपल्यापासून काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाली आहे. ना केंद्रात त्यांचं अस्तित्त्व जाणवतयं ना राज्यात त्यांना कोणी मान देतयं. अशातच ‘इंदू सरकार’सारखा काँग्रेसी व्यवस्थेवर बोट ठेवणारा चित्रपट प्रदर्शित झाला तर उरली सुरली प्रतिमा देखील धुळीस मिळेल, अशी भिती कदाचित या सर्वांना वाटत असणार. सत्तांतर होऊन तीन वर्ष नुकतीच उलटून गेली पण या संपूर्ण कालावधीत काँग्रेस अतिशय भयभीत अवस्थेत कुठेतरी कोपर्यात जाऊन बसल्याचे चित्र दिसून येत आहे. इंदिरा गांधींसारख्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपटातून कोणी चुकीचं दाखवणार असेल तर त्याचा कट्टर काँग्रेसीजनांना त्रास होणारच पण त्याआधी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणं गरजेच आहे. ‘काँग्रेसच्या वरिष्ठांना चित्रपट दाखवा जर त्यात काही आक्षेपार्ह नसेल तर आम्ही तो प्रदर्शित होऊ देवू’, हे असं मधुर भांडारकरला सांगणारे हे कार्यकर्ते कोण लागून गेले? असा उद्विग्न प्रश्न आज समाजमनातून उपस्थित होत आहे.
मधुरचं सुचक भाष्य
या सगळ्या प्रकरणांमधील प्रत्येक घडामोडीनंतर मधुरने सयंमी भूमिका घेतल्याचे दिसून येते. पण काल नागपूरात झालेल्या प्रकरणारनंतर मात्र मधुरने थेट राहुल गांधींनाच सोशल मीडियावरून प्रश्न केला आहे. मधुर म्हणतोय, “पुण्यानंतर मला नागपुरमध्ये होणारी पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. तुम्हाला ही गुंडगिरी मान्य आहे का? मला माझे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे का?’’ अजूनतरी राहुलबाबांनी याचं उत्तर दिलेलं नाही. यासगळ्याशिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने मधुरवर आणखी एक मोठा आरोप होत आहे तो म्हणजे, तुम्ही मोदी समर्थक आहात व भाजपाने हा चित्रपट स्पॉन्सर केला आहे. हे विधान देखील खोडून काढत मधुरने त्याचं योग्य उत्तर दिलयं. एका मुलाखतीत तो असं म्हणलाय की, “मी जर खरच मोदी समर्थक असतो तर ‘इंदु सरकार’मधील 17 आक्षेपार्ह सीन व ‘आरएसएस’, ‘कम्युनिस्ट’, ‘किशोर कुमार’, ‘अकाली’ किंवा जेपी नारायण यांसारखे शब्द मला काढून टाकावे लागले नसते. आणि खरच भाजपाने स्पॉन्सरशिप दिली असती तर मी हा चित्रपट 2019 मध्येच प्रदर्शित केला असता ना...’’.
Dear @OfficeOfRG after Pune I have 2 cancel today's PressCon at Nagpur.Do you approve this hooliganism? Can I have my Freedom of Expression? pic.twitter.com/y44DXiOOgp
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 16, 2017
पुरोगामी लोकांचे खटकणारे मैन...
‘इंदु सरकार’ला सुरूवातीपासून होणारा व्हर्च्युअल विरोध आणि आता काँग्रेसी लोकांनी रस्त्यावर उतरून सुरू केलेली गुंडगिरी याविरूद्ध पुरोगामी मान्यवर मंडळी कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीयेत. याच मान्यवर मंडळींनी काही महिन्यापूर्वीच ‘उडता पंजाब’च्या वेळेस अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावानी गळे काढले होते. पंजाबमध्ये तुमचेच सरकार आहे, त्यामुळेच तुम्ही तो चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीयेत. ही चक्क अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी झाली. वैगेरे...वैगेरे... पण मग ही मंडळी ‘इंदु सरकार’च्या वेळी कुठे गेली. आता त्यांना ही गळचेपी वैगेरे वाटत नाही का? इतर वेळेस इकजुटीने लढणारे ‘बॉलिवूड’ मधले सेलिब्रेटीही यावेळी मोठ्यासंख्येने ‘इंदू सरकार’च्या समर्थनार्थ उतरलेले अजूनतरी दिसत नाहीयेत. आत्तापर्यंत अनुपम खेर, बप्पी लहरी (हे दोघही या चित्रपटाशी संबंधित आहेत.) व महेश भट यांनीच काँग्रेसच्या या वर्तवणूकीला विरोध केला आहे.
Shame!! https://t.co/wx4mxRyUZ9
— Anupam Kher (@AnupamPKher) July 15, 2017
एकंदरीतच काय तर काळ 1975चा असो वा 2017चा असो ‘...और तुम लोग जिंदगी भर माँ-बेटे कीं गुलामी करते रहोंगें’ हा संवाद तेव्हाही समर्पक होता आणि आजही तो तितकाच बोलका असल्याचे सध्याच्या एकूणच वातावरणावरून दिसून येत आहे. आता याचा कोणी कसा अर्थ घ्यायचा हे ज्याचं त्यानी ठरवावं. पुढील काळात असे अनेक चित्रपट येत आहेत की ज्यामुळे काँग्रेसी समर्थकांचे भय संपणे तर दूरच पण ते कमी होण्याची चिन्ह देखील खूप कमी आहेत. आता तेच ठरवतील कशाकशाला आणि कितीवेळा विरोध करायचा ते... तुर्तास वाट बघूयात ‘इंदू सरकार’च्या अनकट प्रदर्शनाची!