सध्या स्पर्धेचे युग आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केल्यापासून आपल्या अर्थ-व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून भारताचा विकासदर ८ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.
रिझर्व बँकेची धोरणे सकरात्मक असून सहकारी बँकांना देखील शाखा उघडण्यास हल्ली सढळ हाताने अनुमती मिळत आहे. परिणामत: व्यापारी बँका असोत अथवा सहकारी बँका, सर्वांनीच नव्या शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला आहे.
प्रत्येक बँक ग्राहकाला आकर्षित करण्याचा कसोशीने प्रयत्न करते आहे. ग्राहकदेखील परंपरागत बांधिलकीचा विचार न करता, छोट्या-छोट्या लाभांकरितासुद्धा बँक बदलताना दिसतात. व्यवसाय वृद्धी साधायची असेल तर विपणनकला आत्मसात करण्यावाचून पर्याय नाही. विपणनाचे मुख्य सूत्र म्हटले तर स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करणे होय. त्यासाठी प्रथमत: आपणास आपलीच नीट ओळख हवी.
आपण बँकर आहोत; आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपण व्यापारी आहोत. समाजाला जी सेवा देतो, ती नि:शुल्क नसते; नफा कमविणे हा या सेवाचा एक प्रमुख उद्देश असतो. सहकारी क्षेत्रात काम कारीत असल्याने आमचे नफा हे एकमेव उद्दिष्ट नसेल हे मान्य! पण वाजवी नफा कमवायलाच हवा! व्यवसाय वृद्धी साधायलाच हवी.
आपल्या नफ्याचा प्रमुख स्रोत म्हटला तर, मिळवलेले व्याज व दिलेले व्याज यातील फरक होय. अर्थात आम्हाला ठेवी हव्यात त्या अल्पमोली व कर्जे हवीत ती जादा व्याज मिळवून देणारी –आणि हो- वेळच्यावेळी वसूल होणारी!
इंग्रजीत SWOT अशी एक संज्ञा येते. वस्तुत: हा स्वतंत्र शब्द नसून ती आद्याक्षरे आहेत. पैकी एस्. म्हणजे ‘स्ट्रेंग्थ (बलस्थाने), डब्ल्यू, म्हणजे ‘विकनेसेस’ (कमकुवत गोष्टी/ मर्मस्थाने), ओ. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी (नव्या उपलब्ध संधी) आणि टी. म्हणजे थ्रेट – (आपल्या अस्तित्वाला आव्हान देणा-या गोष्टी) होत.
हे स्वॉट पृथक्करण आपले आपल्याला करायचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही वाखाणण्याजोगे गुण असतात. कोणी चांगला गायक असेल, तर कोणास मैदानी खेळाची आवड असेल. कोणाला वाचनाची गोडी असेल तर कोणास अन्य काही! ही आपली बलस्थाने होत. ती अधिक बळकट करायला हवीत. कोणाजवळ सभाधीटपणा नसेल तर कोणाचे इंग्रजी कच्चे असेल; अशा कमजोरी शोधून त्यावर सुयोग्य उपाय करणे शक्य असेल; आवश्यक असेल. किमान पक्षी त्यांचा उपद्रव कमी कसा करता येईल हे पाहणे तरी गरजेचे असेल. आपली बलस्थाने ओळखत, आपली दुबळी बाजू लक्षात घेत वेध घ्यायला हवा कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत यांचा! बलस्थान असो की आपल्या अस्तित्वालाच आव्हान देणारी संकटे असोत, आपण त्यांचे रुपांतर संधीत करू शकतो, मात्र तसा सकरात्मक दृष्टिकोन हवा.
हे पृथक्करण जसे आपले व्यक्तिगत करायचे आहे तसेच आपण ज्या संस्थेत काम करतो तिचे ही करयला हवे. आपल्या संस्थेचा आजवरचा इतिहास काय सांगतो? आपल्या संस्थेचे नेमके कार्यक्षेत्र कोणते? तेथील आर्थिक वातावरण कसे आहे? आपली आजवरची प्रगती कशी आहे? आपल्या बँकेची कोणती खास वैशिष्ठये सांगता येतील? आपण तंत्रज्ञान कितपत अंमलात आणले आहे? आपला ताळेबंद आपणास काय सांगतो? आपल्या ठेवींचे स्वरूप काय आहे? ठेवींची किंमत आपणास काय द्यावी लागते? आपले कर्ज-ठेवींचे प्रमाण (सी.डी.रेशो) काय आहे? कर्ज-वितरणाची स्थिती काय आहे? अनुत्पादक कर्जांचे ओझे किती? कोणत्या विभागात वसूली चांगली- कोठे आपण कमी पडतो?
आपल्या कर्मचारी वर्गाची गुणवत्ता सुधारत आहे का? त्यांना आपल्या बँकेच्या सर्व ठेव/कर्ज योजनांचे यथार्थ ज्ञान आहे का? व्यवस्थापनाच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होत आहेत ना?
नाना प्रश्न मनात येवोत; यातूनच आपल्याला आपल्या संस्थेची पुरी ओळख होईल. आपण नेमके कोठे आहोत; कोठे जायचे आहे हे उमगेल. जो पर्यंत आपण कोठे आहोत, हे समजत नाही तो पर्यंत कोठे जायचे हे कळणार नाही. त्याशिवाय ध्येय-निश्चिती होणार नाही.
याच बरोबर आपल्या परिसरात काम करणा-या अन्य बँकांची परिस्थिती काय आहे, एकूण बँकिंग जगतात काय चालू आहे हे देखील समजून घेणे गरजेचे असेल. त्या साठी रिझर्व्ह बँकेची वेबसाईट, बँकिंग विषयाला वाहिलेली विविध मासिके वाचनात हवीत. आपली जिज्ञासा जागृत हवी. आपले सामान्यज्ञान वाढते हवे. बँकिंग ज्ञान ताजे हवे. आपण नेमके कोठे आहोत; कोठे जायचे आहे हे तेव्हाच उमगेल. जो पर्यंत आपण कोठे आहोत, हे समजत नाही तो पर्यंत कोठे जायचे हे कळणार नाही. त्याशिवाय ध्येय-निश्चिती होणार नाही.
व्यक्तिमत्त्व विकास म्हणतात तो काही यापेक्षा वेगळा नाही. अन् हा व्यक्तिगत विकास कोणा एकट्याचा असून भागणार नाही; सांघिक हवा. सर्वच कर्मचारी सांघिक भावनेने प्रेरित असतील नक्कीच चमत्कार घडवतील!
सर्वसाधारणपणे असे आढळते की सहकारी बँकांचे चालू व बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण अन्य व्यापरी बँकांच्या तुलनेत फारच कमी असते. परिणामत: मुदत ठेवींचे प्रमाण जादा होते; ठेवींची एकूणच किंमत वाढते. स्वाभाविकपणे आमचे कर्जाचे व्याजदर तुलनेने अधिक राहतात. जादा व्याज दर देऊनही आमच्याकडून कर्ज घेणारा कर्जदार न जाणो सुयोग्य दर्जाचा नसेल! हे परवडणारे नाही. स्पर्धेत टिकायचे तर चालू व बचत खात्यांचे- त्यातील रकमांचे प्रमाण कसे वाढेल ते पहायला हवे.
आज होते काय? आम्ही शाखा उघडतो. येईल त्याचे – जर त्याने के.वाय्.सी.चे निकष पुरे होत असतील तर- खाते उघडतो. आता वेळ आली आहे या पलीकडे - घरोघरी जाऊन नवी खाती उघडून घेण्याची! ग्राहकाची वाट पहात बसण्यात अर्थ नाही.
रिझर्व्ह बँक सध्या आर्थिक समावेशनासाठी – दारिद्र्य रेषेखालील, खेड्यापाड्यातील लोकांची खाती उघडून घेण्यासाठी –आटापिटा करीत आहे; त्यासाठी के.वाय्.सी.चे निकष देखिल रिझर्व्ह बँकेने शिथिल केले आहेत. या गोष्टीचा आपल्याला फायदा घेता येईल.
सहकारी बँका समाजाच्या अधिक जवळ जाणा-या! मग नवीन बचत खातेदार मिळवण्यात अडचण कसली?
जसे नवे खातेदार मिळविणे जरुरीचे तसेच जुने टिकविणे ही! आमची ग्राहकसेवा सुयोग्य आहे ना? त्यांच्या तक्रारींचा (असल्याच तर) निपटारा वेळच्या वेळी होतो ना- हे डोळ्यात तेल घालून पहायला हवे. याच बरोबर नवनवे तंत्रज्ञान- उदा. सी.बी.एस्., ए.टी.एम्स....इ. पैदा करणे भाग आहे. ‘कायदा पाळा गतीचा! काळ मागे लागला, थांबला तो संपला!’
ग्राहक सेवेसंबंधात अनेकदा अनुभव येतो की ठेवीदारांना चांगली सेवा दिली की पुरे-असा समज! हे खरे नव्हे! वस्तुत: कर्जदार देत असणा-या व्याजावर आमची पोटे चालतात. कर्जाच्या चौकशीसाठी येणा-या प्रत्येकाचे कर्जदारात रुपांतर कसे करता येईल ते पहायला हवे! कर्ज व्यवहारांत प्रत्येकास होकार देणे शक्य नसते हे खरे! पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपला हेतू साध्य करता येऊ शकेल.
कर्ज-वसूलीची प्रक्रिया कर्ज थकल्यावर सुरू होत नाही, तर कर्ज देण्यापुर्वी सुरू होते. त्यामुळेच कर्ज –कमीत कमी हेलपाट्यात, नेमक्या वेळी, गरजे इतके - ना कमी ना जास्त- योग्य ती कागदपत्रे अभ्यासून देणे जसे महत्त्वाचे, तसेच कर्जाचा हप्ता कर्जदारास पेलणारा आहे ना हे पाहणे देखील अत्यावश्क! व्यवहारातील पारदर्शकता, कर्जदाराबरोबर असणारा निरंतरचा संवाद आपली नौका पैल तडीस नेण्यास उपयोगी पडते.
बँका कित्येक अन्य सेवा देत आपला नफा वाढता ठेवत असतात. असे अन्य कोणते मार्ग नव्याने चोखाळता येतील याची पहाणी करता येईल. आपले विविध सेवा दर इतर बँकांच्या तुलनेत कमी-जास्त आहेत का? हल्ली रिझर्व्ह बँकेने विविध सेवांचे दर ठरवण्याचे बरेच स्वातंत्र्य बँकांना दिले आहे. अनेक बँकंनी आपापले नियम बदलून घेतले आहेत; आपले ही नियम बदलणे शक्य/ आवश्यक आहे का? याचा सतत आढवा घ्यायला हवा. त्यासाठी इतर बँकांमधून डोकावणे आले. (आजकाल ब-याच बँकांच्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करता येईल.) इतरांचे अंधनुकरण नको; पण विचारांची दिश तरी समजेल!
विकासाची वाट चोखाळायचीच असे ठरवल्यावर आता आळसाला, अज्ञानाला थारा नाही, हे मात्र नक्की! या आधी उधृत केलेल्या ‘कायदा पाळा गतीचा... ‘ या काव्य-पंक्तिचा उत्तरार्ध सांगतो आणि हा लेख संपवतो. माधव ज्युलियन आपल्या या कवितेत पुढे आश्वासक सूरात म्हणतात-
धावत्याला शक्ती येई, आणि रस्ता सापडे- भ्रांत तुम्हा का पडे!”
-श्रीकांत धुंडिराज जोशी