वेध - साहेब, आता पुरे करा !

    24-Feb-2017   
Total Views | 1

आलेलं अपयश मान्य न करता आपलंच घोडं पुढे कसं दामटवायचं याचा गेल्या सव्वादोन-अडीच वर्षांतला शिवसेना नेतृत्वाचा झालेला सराव महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच उपयोगी पडलेला दिसतो. निकालानंतर पक्षप्रमुखांची आलेली प्रतिक्रिया आणि कालच्या ‘सामना’तून मिळालेले संकेत हे या सरावाचं उत्तमउदाहरण म्हणावं लागेल. दहापैकी केवळ आपल्या पारंपरिक बालेकिल्ला असणार्‍या महापालिकेत सत्ता, जिच्यासाठी जंगजंग पछाडलं त्यात भाजपपेक्षा कशीबशी मिळालेली एक जागा आणि बाकी सर्वच्या सर्व ठिकाणी आलेलं दारूण अपयश यानंतरही आत्मपरीक्षण न करता शिवसेना नेतृत्वाने या निकालाचे अशाप्रकारे विश्लेषण केले की, इतके महिने सेनेसाठी राबणारा खुद्द शिवसैनिकही अगदी बुचकळ्यात पडला.

’’भाजपने सत्ता, साधन व संपत्ती यांच्या जोरावर हे यश मिळवलं,’’ असं उद्धव ठाकरे म्हणाले; ‘अन्यथा सगळं आम्हालाच मिळणार होतं,’ असा त्यातला सूर थोडा बाजूला ठेवला तरी स्वतःचं अपयश मान्य न करता, आत्मपरीक्षणाची तयारी किंवा साधी इच्छाही न दाखवता पुन्हा एकदा अस्मिता, गडकोट-किल्ले, सुरुंग लावणे इत्यादी त्याच त्या मार्गानेच आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना फरफटत नेण्याची आणि भाजपवरच आगपाखड करण्याची सेना नेतृत्वाची ऊर्जा थक्क करणारी आहे. पण स्वतःच्या कोशात राहून जनतेचं राजकारण करता येत नाही. त्यामुळे नेतृत्वाने (खिन्न चेहर्‍याने का होईना) पुन्हा ऊर्जा दाखवली असली तरी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आता ती ऊर्जा राहिलेली नाही. सेनेकडे एक ‘एन्टरटेनमेंट’ म्हणूनच पाहणार्‍यांकडून सकाळच्या शाहिस्तेखानानंतर लगेच संध्याकाळीच हा आणखी ‘एन्टरटेनमेंट पीस’ मिळाल्याबद्दल वाहवा मिळेल कदाचित. पण पक्षवाढीसाठी ती काडीचीही उपयोगी ठरणारी नाही. त्यामुळे आत्मपरीक्षण करणं ही सेना नेतृत्वासाठी काळाची गरज आहे. आणि ते करण्याची इच्छा नसेल तर पक्षाच्या दृष्टीने ती फारच चिंतेची बाब ठरते. दुसर्‍याची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा आपण काय करतो आहोत आणि करणार आहोत हे सांगण्याची सवय किमान आतातरी सेना नेतृत्वाने लावली नाही तर हळूहळू ‘ठासून’ तर सोडाच, ‘घासून’ येण्याच्याही शक्यता मावळत जाईल, यात काही शंका नाही.

साहेब, अहो जनता इतकीही मूर्ख नाही!

निकालानंतरची सेनानेतृत्वाची प्रतिक्रिया म्हणजे भाजपला भरभरून मतदान करणार्‍या राज्यातील कोट्यवधी जनतेला मूर्खात काढण्याचाच प्रकार असल्याचं दिसतं. सत्ता, साधन आणि पैशाच्या जोरावर भाजपने सत्ता आणल्याचे पक्षप्रमुख म्हणाले. म्हणजे भाजपला मतदान करणार्‍यांनी पैसे घेऊन पैशाला भुलून मतदान केले असा त्याचा सरळ अर्थ होत नाही काय? शिवाय सत्ता राबवून जर भाजपने विजय मिळवला, तर त्याचप्रमाणे सेनेलाही सत्ता राबवून विजय मिळवण्यास कोणी रोखले होते? आज केंद्रात व राज्यात सेना सत्तेत आहे, दोन्हीकडे त्यांचे मंत्री आहेत, शिवाय खासदार, आमदार आहेत. भाजपने मंत्र्यांना उतरवून विजय मिळवला तर सेनेच्या मंत्र्यांना प्रचारात उतरून भगवा झंझावात किंवा वादळ वगैरे निर्माण करण्यास कोणी रोखले होते? निवडणुकांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह यांची एकही प्रचारसभा महाराष्ट्रात झाली नाही. शिवाय शिवस्मारक जलपूजनासारखे जे मोठे कार्यक्रमझाले ज्यांचा वास्तवात निवडणुकीशी कुठेही संबंध नव्हता. समजा, ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केले गेले, असे जरी मानले तरी त्या कार्यक्रमाला हे पक्षप्रमुख त्या व्यासपीठावरच पंतप्रधानांसोबत बसलेले होते, त्यांची भाषणंही झाली होती. त्यामुळे भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मोदी, अमित शाह हे पक्षाचे क्र. १ चे किंवा पहिल्या फळीतील नेते दूर राहिले व मुख्यमंत्री, मोजके केंद्रीय व राज्यातील मंत्री आदी दुसर्‍या फळीतील नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. दुसरीकडे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे सेनेचा क्र. १ चा नेता स्वतः पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळत होता. असे असतानाही शिवसेनेची कामगिरी ही अशी झाली.

या सगळ्या गोष्टी लोकांना कळत नाहीत असं सेना नेतृत्वाला वाटतं काय? लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका आणि पुन्हा महापालिका आणि जिल्हा परिषदा. गेली अडीच वर्षं तोच तो रडीचा डाव बघणारी जनता मूर्ख आहे, त्यांना काहीच कळत नाही अशीच सेना नेतृत्वाची समजूत असल्याचे दिसत असले तरी जनता चांगलीच समंजस असून ती मतदानाच्या हक्कातून वारंवार योग्य तो संकेत देत आहे. आता हे इतके सारे इशारेही शांतपणे समजून न घेतल्यास मोठा धक्का द्यायला २०१९ देखील आता फार दूर नाही..!

-निमेश वहाळकर

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 

अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121