अर्शद वारसीला ‘सर्किट’च्या व्यक्तिरेखेपेक्षाही एक नवी ओळख मिळवून देणार्या ‘जॉली एलएलबी’या चित्रपटाचा सिक्वेल नुकताच प्रदर्शित झालाय. मी जॉली एलएलबी पाहिला नसल्याने यातील तुलना करून त्यावर भाष्य करणे थोडेसे कठीण आहे. ‘जॉली एलएलबी-2’ मध्ये अर्शदच्या जागी आपल्याला दिसतो अक्षय कुमार. तसं अक्षय कुमार आता खान लोकांच्या पक्तींत जाऊन बसल्यामुळे त्याचा चित्रपट म्हटला की तो पडदा व्यापून टाकणार किंवा त्याचचं नाणं संपूर्ण चित्रपटात खणखणीत वाजत राहणार हे ठरलेलं असतं. या चित्रपटात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यात अक्षयच्या सोबत असणार्या सहकलाकारांचा अभिनयही तितकाच उठावदार झाल्याने अक्षयचे वलय कुठेतरी थोडेसे झाकले गेले आहे.
या चित्रपटाची कथा सांगण्यात किंवा त्याचे धागेदोरे उलगड्यात काही अर्थ नाही कारण फार गुढ नाही परंतु काहीशा प्रमाणात हा चित्रपट अखेरपर्यंत तुमची उत्सुकता ताणून धरतो. कानपूर आणि लखनैऊ मध्ये ही कथा घडतीये. अर्थात चित्रपटाचा कलाकार वकिल असल्याने बहुतांश चित्रपट कोर्टरूम ड्रामाच असणार हे वेगळ सांगण्याची आवश्यकता नाही. अल्पावधीत पैसा कमवून श्रीमंत होण्यासाठी नायक म्हणजेच जॉली अक्षरश: वकिली पेशाची दलाली करत असतो. परंतु एक गंभीर घटनेतून आपल्या चुकीच्या वागण्याची कल्पना येते आणि संबंधित व्यक्तिला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्याची व्यवस्थेविरूद्धची लढाई सुरू होते. याच घटनेभोवती संपूर्ण चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे.
सुरूवात आणि त्यानंतरचा थोडा कालावधी हलक्या फुलक्या विनोदनिर्मितीतून हा चित्रपट तुम्हाला यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू चित्रपट गंभीर विषयाकडे जाताना कथेचे एकेक कंगोरे आपल्या समोर उलगडतो आणि आपसुकच आपली उत्सुकता अधिक ताणली जाते व आपण त्या कथेचाच एक भाग होऊन जातो. पण हे केवळ मध्यंतरानंतरच्या काही काळापर्यंतच, त्यानंतर दिग्दर्शकाची या चित्रपटावरची पडक हळूहळू सैल होत गेली आहे आणि सरतेशेवटी आपल्याला काहीतरी मोठं अपेक्षित असतं, पण दिग्दर्शक मात्र त्यातून अगदीच छोटं काहीतरी बाहेर काढल्यासारखं दाखवतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ‘डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं’ झालयं.
बर्याचदा कोर्टातले चित्रिकरण आपल्याला कंटाळवाणे भासते. पण इथे चित्र थोडं वेगळं आहे. दिग्दर्शक, कथा व पटकथा लेखक सुभाष कपूर याने रसिकांचे मनोरंजन होईल याची पुरेपुर काळजी घेतली आहे. विशेष म्हणजे या कोर्टरूम ड्रामामध्ये अधिक कौतुक करावसं वाटतं ते न्यायाधीशाची भूमिका साकारणार्या सौरभ शुक्लाचं. आपल्या देहबोलीतून, संवादातून एवढचं काय तर चष्मा काढून पेपर्स वाचण्याच्या अनोख्या स्टाईलमधून त्यानी कमाल अभिनय केलाय. त्याच्या सोबतीला अन्नु कपूरने योग्य साथ दिलीये. वर नमूद केल्याप्रमाणे अक्षयचे वेगळे अस्तित्व या चित्रपटात भासत नाही कारण अन्नु कपूर आणि सौरभ शुक्ला या दोघांचा अभिनय अधिक उठावदार झाला आहे. याचा अर्थ अक्षय अभिनयात कुठे कमी पडलाय असा मुळीच होत नाही. ‘रूस्तम’ आणि त्यानंतर आलेला ‘जॉली एलएलबी-2’ या दोन्हीमध्ये चित्रपटाचा बर्यापैकी भाग कोर्टातच आहे, त्यामुळे कोर्टाचे नियम, वकिलांच्या चालीरिती याबाबत अक्षय आता अधिक प्रगल्भ झाला असावा. हुमा कुरेशीला खरच वाया घालवलयं. तिच्या जागी ही भूमिका कोणीही साकारली असती तरी चित्रपटाच्या यशावर त्याचा फारसा फरक पडला नसता. कारण त्या व्यक्तिरेखेतच मुळात दम नाहीये.
कथा आणखी थोडी साचेबद्ध व बांधीव असायला हवी होती. प्रेक्षकांना असलेली अपेक्षा ही कथे शेवटी जाऊन पूर्ण करू शकत नाही त्यामुळे ही पकड सैल असल्याचे मी म्हटले आहे. काही गोष्टी तर मनाला पटतच नाहीत, यामध्ये उदाहरणादाखल दोन-तीन गोष्टी इथे नमूद करतो. एक म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात केस लढविणार्या जॉलीवर जीवघेणा हल्ला होतो, त्याची कुठेही तपासणी होत नाही; साधा ‘एफआयआर’ही दाखल केलेला दाखविलेला नाही. हेच दुसरीकडे कानपूरमध्ये जॉलीवर झालेल्या हल्ल्याची बातमी जम्मूकाश्मिरमधल्या जेलमध्ये असणारा कैदी तिथल्या स्थानिक वृत्तपत्रात वाचतो. या दोन्ही गोष्टी अत्यंत विरोधाभास निर्माण करणार्या आहेत. किंवा जम्मूमधून जॉलीचं अगदी सहीसलामत पुन्हा कापनूरमध्ये येणं तितकसं मनाला पटत नाही.त्याचबरोबर गेल्या काही वर्षातले तुमचे अवैध धंदे मी बाहेर काढीन असं साधा वकिल असणारा जॉली पोलिस आयुक्ताला सांगतो आणि त्याला घाबरून तो त्याला अपेक्षित कार्य घडवून आणतो. चित्रपटातील अशा काही घटनांमुळेच चित्रपटाची कथा वास्तवाच्या अधिक जवळ जाऊ शकत नाही.
कथेतील धागेदोरे सैल असले तरी यातील संवाद हे चित्रपटाचे खरे बलस्थान म्हणावे लागेल. अनेक संवाद आपसुकच टाळ्याखेचून जातात आणि विशेष म्हणजे यातील बहुतांश संवाद हे अन्नु कपूर किंवा सौरभ शुक्लाच्या तोंडी देण्यात आले आहेत. याखेरीज छोट्या छोट्या गोष्टींमधून भारतीय न्यायव्यवस्थेवर किंवा एकूणच न्यायालयातील कामकाजावर दिग्दर्शकाने केलेली बोचरी टिकाही आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाही. अक्षय, अन्नु व सौरभ यांच्यातील कोर्टातील जुगलबंदी पाहायची असले आणि घटकाभर मनोरंजन करून घ्यायचं असेल तर ‘जॉली एलएलबी-2’ एकदा बघायला हरकत नाही.
----