आता १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचे लक्ष्य - विनोद तावडे

    03-Nov-2017
Total Views |

 

 

प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक शाळा निवडण्यात येईल. शाळांच्या निवडीसाठी माध्यमाची अट नाही.

मुंबई : ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या योजनेंतर्गत १०० निवडक शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. तसेच १०० शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या केल्यानंतर पुढील काळात राज्यातील सर्वच शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनविण्यासाठी राज्यभरात हा कार्यक्रम राबविण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

 

जागतिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील राज्यातील शिक्षण संस्थांचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी दर्जेदार शाळांच्या निर्मितीसाठी निकषांची निश्चिती करण्यात आली आहे. या निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात येऊन त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकेल इथपर्यंत विकसित करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे.

 

प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक शाळा निवडण्यात येईल. पण निवडीसाठी माध्यमाची अट नाही. - शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय दर्जासाठी शाळांची निवडी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत विद्या प्राधिकरण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण संचालक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

 

निवडीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे -

  • प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक शाळा निवडण्यात येईल. शाळांच्या निवडीसाठी माध्यमाची अट नाही.
  • मात्र मराठी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळा असतील तर त्या शाळेतील शिक्षणात इंग्रजी भाषा व स्पोकन इंग्लिशचा दर्जा अतिउत्कृष्ट असणे अनिवार्य आहे.
  • शाळा इंग्रजी माध्यमाची असेल तर तिथे मराठी भाषा शिक्षणाचा दर्जा अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

 

या योजनेची उद्दीष्ट्ये -

  • माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणणे.
  • शैक्षणिक कामगिरीत राज्याला देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणणे.

 

यासाठी शिक्षण मंत्र्यांनी अनेक निर्देशही यावेळी प्रसिद्ध केले. ते म्हणाले, निवड करण्यात आलेल्या शाळांच्या प्रशिक्षणाकरिता विद्या प्राधिकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येईल. त्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठ, ब्रिटीश कौन्सिलची मदतदेखील घेतली जाईल. त्यांच्या सूचनेनुसार अभ्यासक्रमात योग्य ते बदल केले जातील. निवड करण्यात आलेल्या शाळांच्या तीनही घटकातील लोकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. या प्रशिक्षण वर्गांमध्ये आवश्यकतेनुसार सध्या वरच्या क्रमांकावर असणाऱ्या देशातील शाळांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येईल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये सरासरी ५०० गुण मिळावेत अशा पद्धतीची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाईल.