गेल्या २० वर्षाची आपली जीवनपद्धती आणि आत्ताची पद्धती यात जमीन-आसमानचे अंतर आहे असे म्हटले जाते. मात्र आता या जमीन आणि आसमानच्यामध्ये साचला जाणारा धूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण त्याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर काळासोबत मानवाच्या गरजांचे स्वरूप देखील बदलत जात असल्यामुळे हा बदल होताना दिसतो. आजच्या वीस वर्षांपूर्वी प्रत्येक घरात दुचाकी अथवा इतर वाहने नसत. मोठ्याप्रमाणात लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना दिसत. मात्र आजची परिस्थिती अत्यंत किचकट झाली असून आज प्रत्येक घरात किमान एक आणि सरासरी २ वाहने नक्कीच असतात. त्यामुळे लागणाऱ्या इंधनाची मागणी देखील वाढली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून होणाऱ्या प्रदूषणात मोठ्याप्रमाणात भर पडलेला आहे.
अश्या पद्धतीने आणि याच गतीने आपण जीवन जगत राहिलो तर येणाऱ्या २० वर्षांनी प्रदूषणाची स्थिती काय असेल? याची कल्पना देखील करवत नाही. या विपरीत परिणामाचे उदाहरण म्हणून आपण दिल्लीत होणाऱ्या धुराक्यांच्या परिणामाकडे बघितले पाहिजे. वाढलेल्या वाहन संख्यामुळे प्रदूषणात वाढ झाली, आणि परिणामत: ऐन थंडीच्या काळात तेथे धुरके साचून वातावरण विषारी बनले आहे. त्याचे अनेक विपरीत पडसाद दिल्लीकरांच्या वैयक्तिक आयुष्यात उमटू लागले आहे. ही परिस्थिती देशातील किंवा जगातील इतर शहरांवर होऊ द्यायची नाही, असे जेव्हा लक्ष्य डोळ्यांसमोर उभे राहते, तेव्हा सी.एन.जी. इंधनाचे महत्व विषद करावेच लागते.
सी. एन. जी. तंत्रज्ञान
कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात सी.एन.जी. यात मिथेन नावाचा वायू दाब देऊन साठवला जातो. अत्यंत मोठ्या दाबाखाली मिथेन सिलेंडरमध्ये भरून याचा वापर इंधन म्हणून करण्यात येतो. हे इंधन पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून वापरले जाते. सी.एन.जी. हे इतर इंधनापेक्षा तुलनेने सुरक्षित आहे. कारण नैसर्गिक वायू हवेपेक्षा कमी वजनाचा असतो, तसेच त्याचे विघटन देखील जलद गतीने होत असते. त्यामुळे यापासून विपरीत परिणाम होण्याच्या शक्यता इतर इंधनापेक्षा कमी असतात.
याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिथेन वायू कॉम्प्रेस्ड होत असताना १ टक्क्यापेक्षा कमी जागा व्यापते, त्यामुळे छोट्या बंद पात्रात अधिकाधिक इंधन सामावण्याची क्षमता असते. हे इंधन वाहनात वापरता यावे म्हणून त्यासाठी वाहनांचे वेगळे इंजिन तयार केले जाते. काही इंजिन हे सी.एन.जी. आणि गॅसोलाईन प्रणाली या दोन्हीसाठी वापरले जातात, तर काही सी.एन.जी. आणि डिझेल/पेट्रोल यांच्या उपयोगासाठी तयार केलेले असतात.
सद्यस्थितीत जगात एकूण वाहनांच्या तुलनेत सी.एन.जी. वाहनांचा वापर ३० टक्के एवढा आहे, अत्यंत कमी कालावधीत हा आकडा गाठण्याचे कारण म्हणजे या तंत्रज्ञानात तयार झालेल्या इंजिनची किफायतशीर किंमत. सी.एन.जी. इंजिनची वाहने ही पेट्रोल आणि डीझेल इंजिनपेक्षा कमी दरात बाजारपेठेत उपलब्ध आहेत, त्याचबरोबर हे इंधन देखील कमी दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.
सी.एन.जी. वापरणारे देश
२०११ च्या आकडेवारीनुसार जगात १४.८ दशलक्ष सी.एन.जी. वाहने आहेत. यात सर्वाधिक वापर करणारा देश म्हणजे इराण होय. इराणमध्ये २.८६ दशलक्ष एवढी वाहने सी.एन.जी. वर चालवली जातात. त्यापाठोपाठ पाकिस्तानचा क्रमांक लागतो. पाकिस्तानमध्ये २.८५ दशलक्ष वाहने सी.एन.जी. वर चालवली जातात. याच ओळीत अर्जेंटिना (२.०७ दशलक्ष), ब्राझील (१.७ दशलक्ष), आणि भारत (१.१ दशलक्ष) येथे एवढी वाहने चालवली जातात.
देश पातळीवर विचार करायचा झाल्यास भारतात दिल्लीत सर्वाधिक सी.एन.जी. वाहने वापरली जातात. २०१६ पासून तेथे दुचाकीत देखील सी.एन.जी. कीट बसविण्यात आली आहेत. त्यानंतर अहमदाबादचा क्रमांक लागतो. अहमदाबाद येथील सार्वजनिक वाहतुकीत मोठ्याप्रमाणात सी.एन.जी.चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक चारचाकी या सी.एन.जी. इंजिन असलेल्या आहेत. त्यानंतर अनुक्रमे मुंबई, पुणे, कोलकाता, लखनऊ, कानपूर या शहरांचा समावेश होतो.
पुण्यात दुचाकी सी.एन.जी. कीटचे अनावरण
पुण्यातील ५ हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी, दुपारी ३.३० वाजता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी आपल्या दुचाकींना सीएनजी कीट बसवून पुण्याला स्वच्छ आणि हरित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- हर्षल कंसारा