नामनिर्देशन म्हणजे खातेदाराने / खातेदारांनी त्याच्या/त्यांच्या हयातीतच त्यांच्या मृत्यूनंतर “रक्कम कोणास द्यावी” याबाबत करून ठेवलेली व्यवस्था! खातेदाराने बँकेस सांगून ठेवलेली व्यक्ती म्हणजे नामनिर्देशित व्यक्ती! या व्यक्तीस बँकेने रक्कम अदा केली की बँकेची कायदेशीर जबाबदारीतून मुक्तता होते. बँक फक्त खातेदाराच्या मृत्यूची खातरजमा करेल; नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवून घेऊन रक्कम अदा करेल. ना हमीपत्राची गरज की प्रतिज्ञापत्राची! रक्कम अदा करण्याचा निर्णय शाखा व्यवस्थापकानेच घेण्याचा! वरिष्ठ कार्यालयाच्या अनुमतीचीही गरज नाही. म्हणूनच ही पद्धत सोपी. झटपट!
नामनिर्देशन कोणीही व्यक्तिगत खातेदार करू शकतो. हल्ली खाते उघडतानाच नामनिर्देशन करता येते. ‘व्यक्तिगत’ या संज्ञेत एकट्याचे खाते, संयुक्त खाते या बरोबरच व्यावसायिक नावाने उघडलेल्या एकट्याच्या मालकीच्या (सोल प्रोप्रायटर) खात्यांचा देखील समावेश होतो. ठेवीदार अज्ञान (१८ वर्षाखालील) असेल, तर अज्ञानाच्या वतीने नैसर्गिक / कायदेशीर पालक नामनिर्देशन करू शकेल. (असे पालकाने केलेले नामनिर्देशन अज्ञान व्यक्ती १८ वर्षाची होताच, गळून पडेल.आता नव्याने सज्ञान झालेल्या व्यक्तीने स्वत:चे अधिकार वापरून नवे नामनिर्देशन करायला हवे.)
हे नामनिर्देशन प्रत्येक प्रकारच्या ठेवीसाठी स्वतंत्र असावे लागते. बचत खात्यासाठी केलेले नामनिर्देशन मुदत ठेवीसाठी आपोआप लागू होत नाही. दोन मुदतठेव पावत्यांपैकी एकाच पावतीस नामनिर्देशन केले तर ते दुस-या पावतीसाठी लागू नाही. प्रत्येक ठेवीसाठी अलग नामनिर्देशन लागते; प्रत्येक ठेवीसाठी वेगळी व्यक्ती नामनिर्देशित असू शकते.
ठेव खाते संयुक्त पद्धतीचे (कोणाही एकास अथवा हयात असेल त्यास रक्कम देय) असल्यास देखील नामनिर्देशन करता येते, ते हितकारक ठरते! संयुक्त खाते दोघांच्या एकत्र सहीने चालवले जात असले तरीही नामनिर्देशन शक्य आहे.
नामनिर्देशन केवळ एका व्यक्तीच्या नावे करता येते; अनेकांच्या नव्हे; संस्थेच्याही नव्हे. नामनिर्देशित खातेदाराची नातेवाईकही नसेल; मित्राच्या नावेसुद्धा नामनिर्देशन करता येईल. ती व्यक्ती वारस असण्या-नसण्याचा संबंध नाही. म्हणूनच याचे काहीवेळा ‘वारसनोंद’ असे केले जाणारे मराठी भाषांतर चुकीचे आहे.
नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) अज्ञान (१८ वर्षाखालील) असेल, तर त्याची जन्मतारीख नमूद करणे आवश्यक! ती व्यक्ती अज्ञान असतानाच रक्कम द्यावयाचा प्रसंग आला तर, त्याच्या वतीने रक्कम कोण स्वीकरेल हे देखील फॉर्ममध्ये नमूद करणे, जरूर! अज्ञानाच्या वतीने, ठेवीदाराच्या पश्चात, बँकेकडून रक्कम घेणारी व्यक्ती त्या अज्ञानाचा नैसर्गिक पालक असण्याची गरज नाही. कोणीही दादा-मामा-काका-आत्या-मावशी चालेल.
नामनिर्देशन ठेवींप्रमाणेच लॉकर्ससाठी, सेफ-कस्टडीसाठी देखील करता येते. या सा-यांसाठी वेगळे फॉर्म असतात. लॉकरसंबंधात एक विशेष तरतूद आहे. संयुक्त नावे असणा-या, तो चालविण्यासाठी दोघांची उपस्थिती अनिवार्य असणा-या लॉकरबाबत दोघेही स्वतंत्रपणे नामनिर्देशन करू शकतात. लॉकर हाताळणा-यापैकी एकाचा मृत्यू झाला तर, हयात व्यक्ती व मयताने नेमलेली नामनिर्देशित व्यक्ती एकत्रितरीत्या (केवळ बंद करण्यासाठी) लॉकर हाताळतील. मात्र लॉकरची हाताळणी सुंक्त धारकांपैकी कोणीही एक करणार असेल तर, नामनिर्देशन केवळ एकाच्याच नावे करता येईल.
बँका नामनिर्देशन गुप्त ठेवतात. नामनिर्देशित व्यक्तीची सही सदर फॉर्मवर कोठेही नसते. खातेदार हे नामनिर्देशन त्याच्या हयातीत अनेकदा बदलू शकतो; रद्द करू शकतो. नामनिर्देशितास याचा पत्तासुद्धा असणार नाही. हे नामनिर्देशन गुप्त ठेवण्यात बँकांसमोर ग्राहकाचे हितच डोळ्यासमोर असते. पण ग्रहाकाने लेखी स्वरूपात ‘नामनिर्देशित व्यक्तीचे नाव पासबूकावर/ ठेवपावतीवर लिहून द्या’ असे म्हटले तर बँका ते लिहूनही देतात. अनुभव असा की अशी मागणी करणे अंतत: ग्राहकाच्या हिताचेच ठरते.
फॉर्म भरून देतान खातेदाराने खूपच काळजी घ्यायला हवी. ठेव/ लॉकर.... आदींचा पूर्ण तपशील, निर्देशिताचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, खातेदाराशी नाते (असल्यास) नमूद करावयास हवे. फॉर्म जेथे भरला त्या गावाचे नाव, दिनांक हवाच! ठेवीदाराची बँकेच्या दफ्तरी असणा-या नमुन्याप्रमाणे सही (जोड खाते असल्यास सर्व खातेदारांच्या सह्या) आवश्यक. ज्याच्या नावे नामनिर्देशन करावयाचे त्याची सही बँकेच्या दफ्तरी नसते. किंबहूना त्याला या नामनिर्देशनाबाबत काहीच माहिती नसेल.
खातेदार निरक्षर असेल, सही ऐवजी अंगठ्याचा ठसा देत असेल, तर दोन साक्षीदारांची आवश्यकता असते. साक्षर खातेदारांसाठी साक्षीदाराची आवश्यकता नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने नुकताच केला आहे.
कित्येकदा फॉर्म चुकीचे भरलेले असतात. खातेदाराच्या मृत्यूनंतर दुरुस्ती अशक्य! मग नामनिर्देशन वाया जाईल; बँक रक्कम देणार नाही. म्हणून फॉर्म व्यवस्थितच भरला गेला पाहिजे.
खातेदाराच्या हयातीत नामनिर्देशितास कसलेच अधिकार नाहीत. त्याचे अधिकार खातेदाराच्या मृत्यूनंतरच सुरू होतात. ठेव संयुक्त नावे असेल, तर संबंधित सर्व व्यक्तींच्या हयातीनंतरच नामनिर्देशित व्यक्तीचा संबंध येतो; तो पर्यंत नाही. नामनिर्देशित व्यक्ती हयात नसेल, तर ‘नामनिर्देशन नव्हते’ असे मानले जाईल; नामनिर्देशिताच्या वारसांचा काहीही संबंध नाही.
खातेदाराच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर नामनिर्देशन आहे का हे तपासून त्याप्रमाणे बँकेने संबंधित नामनिर्देशित व्यक्तीस त्याच्या नावे असण-या नामनिर्देशनाबाबत कळविणे गरजेचे आहे; बँकेकडे त्याचा पत्ता असतोच! नामनिर्देशन बँक गुप्त ठेवते हे खरे; पण खातेदाराच्या हयाती नंतर कसली गुप्तता? नामनिर्देशित व्यक्तीस त्याच्या नावे असणारे नामनिर्देशन माहितच असणार नाही; तर मग तो दावा कसा करू शकेल? अर्थात या कामी बँकेनेच पुढाकार घ्यायला हवा.
मूळ खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस रक्कम अदा करतानाची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात अली आहे. नामनिर्देशित व्यक्तीने फक्त एक छोटा फॉर्म भरून द्यायचा आहे; सोबत खातेदाराच्या मृत्यूचे प्रमाणपत्र व स्वत:ची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे दिली की पुरे.
नामनिर्देशित व्यक्ती, मुदत ठेवीची रक्कम मुदतपूर्व मागू शकते. पण मुदत ठेव पावतीच्या तारणावर त्यास कर्ज मात्र मिळणार नाही. पावतीची मुदत संपली असल्यास पावतीचे नुतनीकरण बँक मयत व्यक्तीच्या नावे होणार नाही; रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या हवाली केल्यानंतर, त्याने हवी तर स्वत:च्या नावे पुनश्च ठेवावी.
खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीसच रक्कम अदा करणे बँकेस भाग आहे. मयत खातेदारांच्या (अन्य) वारसांनी आक्षेप घेतलाच तर त्याकडे बँक चक्क दुर्लक्ष करेल; (अपवाद न्यायालयाच्या थेट मनाई आदेशाचा!) मयत खातेदाराच्या ठेवींसाठी बँकेकडे तिघांचे दावे येऊ शकतात; कायदेशीर वारस, मृत्युपत्रान्वये दावा करणारा व नामनिर्देशित. पैकी बँक फक्त नामनिर्देशित व्यक्तीची मागणी मान्य करेल. त्याला रक्कम देऊन टाकली की बँकेची पूर्णांशाने सुटका होते.
नामनिर्देशित व्यक्ती वारस असेलच असे नव्हे; (आणि वारस असेलच तर अन्य वारसही असतील;) या निर्देशितास खातेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम घेण्याचा अधिकार असेल; पण रकमेवर नसेल. त्याच्याकडे सुपूर्त केलेली रक्कम त्याने मयताच्या योग्य त्या वारसांकडे पोचवायची आहे. सदरहू रक्कम जवळ ठेवण्याचा, मनाप्रमाणे खर्च करण्याचा, नैतिक / कायदेशीर अधिकार त्यास नाही. तो एक प्रकारे विश्वस्त म्हणून काम करतो. वारसांनी या नामनिर्देशिताकडे सदरहू रकमेची मागणी केल्यास ती त्यास वारसांना द्यावी लागेल. या सर्व प्रक्रियेत वारसदारांचे अथवा मृत्युपत्रधारकांचे हक्क डावलले जात नाहीत. त्यांचे हक्क शाबूत राहतात; परंतू पुढील घटनांसाठी बँकेचा संबंध राहात नाही. वारसदारांनी अथवा मृत्युपत्र धारकाने त्याच्या मर्जीनुसार न्यायालयात दावा दाखल करून आपला हक्क बजावावा.
नामनिर्देशित व्यक्तीने, बँकेने त्याच्या ताब्यत दिलेल्या रकमेचे पुढे काय केले, या गोष्टीशी बँकेचा काडीमात्र संबंध नाही; त्याची ओळख पटवून घेऊन त्यास रक्कम अदा केली की बँकेचे काम संपले. यातून वारसांची भांडणे संपतील असे नव्हे; ती भांडणे न्यायालयात जातील ही; फक्त बँकेची सुटका झाली. जी गोष्ट ठेवींची तीच लॉकर अथवा सेफ कस्टडीची! तेथेही वारसदारांना डावलून लॉकरमधील वस्तू नामनिर्देशित व्यक्तीच्या हवाली केल्या जातील.
सर्वसामान्यांना काही वेळा नामनिर्देशन हा मृत्यूपत्राला पर्याय वाटतो; तसा तो नाही. मृत्युपत्रान्वये स्वकमाईचा काही भाग स्वत:च्या इच्छेनुसार इतरांना देता येतो. नामनिर्देशनाने हे साध्य होत नाही. आपल्या मालमत्तेतील वाटा अन्य कोणास देण्याचीच इच्छा असेल तर ‘मृत्युपत्र अधिक नामनिर्देशन’ हे योग्य ठरेल.
नामनिर्देशन सुविधा जाती-धर्माच्या पलीकडे जाते. ते सक्तीचेही नाही. खातेदाराने नामनिर्देशन केलेच पाहिजे असे कायदा सांगत नाही. परंतू ते करणे कधीही हितावह! त्यामुळे मयताच्या मागे राहणा-या वारसांचे बँकेकडून रक्कम मिळवण्याचे श्रम/ वाचतात. दगदग टळते. आणि म्हणूनच नामनिर्देशन आग्रहपूर्वक घ्यावे असे रिझर्व्ह बँकेचे सांगणे आहे.
नामनिर्देशन फक्त बँकेपुरतेच मर्यादित नाही; सहकारी सोसायटीमधील सदनिकेपासून ते विमा पॉलिसी पर्यंत अनेक ठिकाणी नामनिर्देशन करणे शक्य व हितावह असते. सर्व ठिकाणी नामनिर्देशनाचा हाच अर्थ असेल. (नामनिर्देशित व्यक्ती वारस/हक्कदार नसून विश्वस्त आहे! मालमत्ता यथायोग्यरीत्या वारसदारांना पोचवण्याची जबाबदारी नामनिर्देशितावर आहे.) सर्वच ठिकाणचे नियम समांतर असले तरी एक नाहीत. हे देखील लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थ भविष्यनिर्वाह निधीच्या नियमानुसार नामनिर्देशन एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे करता येते. बँकेला लागू असणा-या नियमांनुसार फक्त एकच व्यक्ती नेमता येते.
-श्रीकांत धुंडिराज जोशी