'बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम'

    25-Jan-2017   
Total Views |


बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या एकूण राष्ट्रीय प्रवाहाबद्दल भरपूर अभ्यास होता. त्यांच्या प्रबंधाचा विषयच होता, “भारताचा राष्ट्रीय लाभांश – इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन (The National Divident of India – A Historical and Analytical Study)” अर्थातच भारताचा इतिहास, त्यातून आलेले सामाजिक प्रवाह, त्यात आलेल्या विकृती, मुस्लिम आक्रांता, त्यांनी केलेला विध्वंस या सर्वांबद्दल बाबासाहेबांनी विस्तृत आणि सखोल अध्ययन तर केलं होतंच, पण या सर्व विषयांवर त्यांनी नेहमीच आपली रोखठोक मतं मांडलेली आहेत.

२८ डिसेंबर, १९४० ला त्यांचं Thought on Pakistan हे पुस्तक प्रकाशित झालं. तेंव्हापर्यंत पाकिस्तान चा मुद्दा तापला होता, पण ऐरणीवर आलेला नव्हता. पुस्तक प्रकाशित होताना दुसरं महायुध्द सुरु झालेलं होतं. या पुस्तकात बाबासाहेबांनी इस्लाम बद्दल आणि पाकिस्तान च्या निर्मिती बद्दल काहीही आडपडदा न ठेवता अत्यंत स्पष्टपणे आणि निर्भीडपणे आपली मतं मांडलेली आहेत. त्यांनी फाळणीच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. इस्लाम पासून ‘सुटका’ करून घेण्यासाठी फाळणी किती आवश्यक आहे, याचं वारंवार समर्थन केलेलं आहे. मुसलमानांबरोबर हिंदुंचं सहअस्तित्व शक्य नाही, हे त्यांनी दमदारपणे मांडलं आहे. आणि म्हणूनच फाळणी होताना लोकसंख्येच्या अदलाबदली चं तत्व त्यांनी आवश्यक म्हटलेलं आहे.

महत्वाचं म्हणजे, पुढे हिंदू – मुसलमान दंगली, नंतर फाळणी, स्वातंत्र्य, संविधानाची निर्मिती ह्या सर्व प्रक्रियांनंतरही त्यांची मतं या विषयावर ठाम आहेत. फाळणी होताना लोकसंख्येची अदलाबदल होऊ शकली नाही, तरीही बाबासाहेबांना फाळणी होणं ही चांगली घटना वाटतेय. पाकिस्तानावरील पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर, पंधरा वर्षांनी त्यांनींच लिहिलेल्या एका लेखात ते मुसलमानांना चक्क ‘शाप’ ह्या शब्दाने संबोधतात. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या Dr. Babasaheb Ambedkar – Writing and Speeches ह्या ग्रंथ साहित्याच्या पहिल्या खंडात १४६ व्या पानावर याचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबासाहेब लिहितात –
”When partition took place, I felt that God was willing to lift his curse and let India be one, great and prosperous” (जेंव्हा फाळणी झाली, तेंव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..!)

इथे ‘शाप’ हा शब्द कोणत्या अर्थी त्यांनी वापरला आहे, हे स्पष्ट आहे. इस्लामी आक्रमकांचा इतिहास त्यांना फार चांगला ठाऊक आहे. हिंदू आणि बौध्द धर्मियांवर मुसलमानांनी केलेले पाशविक अत्याचार त्यांना चांगल्याने माहीत आहेत. त्या अत्याचारांचा ते स्पष्टपणे उल्लेखही करताहेत. अर्थात या इस्लामी प्रजेपासून वेगळ होऊनच भारताचा विकास होऊ शकतो हे त्यांना ठामपणे जाणवतंय.

हे पुढे लक्षातही येतंय. त्यांच्या मृत्युच्या फक्त सहा महिन्यांपूर्वी, अर्थात २३ जून, १९५६ ला अखिल भारतीय बौध्दजन समितीच्या दिल्ली च्या सभेत बाबासाहेबांनी आपले हेच विचार अधिक स्पष्टपणे मांडले आहेत –
“I was glad that India was seperated from Pakistan. I was the philosopher so to say, of Pakistan. I advocated Pakistan because I felt that it was only by partition that Hindus would not only be independent, but free.”

त्यांच्या पाकिस्तान वरील ग्रंथात या सर्व बाबींचे सखोल विवेचन केलेले आढळते. त्यांच्या वकिली शैलीत त्यांनी पाकिस्तान विषयक लिहिताना दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत.

‘मुस्लिम केस फॉर पाकिस्तान’ ह्या शीर्षकांतर्गत तीन प्रकरणं आहेत. त्यात ‘मुस्लिम लीग च्या मागण्या’, ‘राष्ट्राला ‘घर’ हवे’, ‘दुर्दशेपासून पलायन’ या सारख्या विषयांवर लिहिलेली प्रकरणं आहेत.

विशेषतः मुसलमानांनी, ‘मुसलमान हे वेगळे राष्ट्र असल्यानेच त्यांना भौगोलिक परिवेश हवा’ ही मागणी केल्यानंतर, राष्ट्रा संबंधी बरेच विवेचन केलेले आहे. मुसलमान जर स्वतंत्र राष्ट्र मागत असतील / मानत असतील तर मुळात भारत हे राष्ट्र राहतच नाही आणि मग ह्या सिद्धांताचा कसा जोरदार प्रतिवाद केला पाहिजे याविषयी समरसून लिहिलं आहे.

पुस्तकातली पुढील तीन प्रकरणं ही ‘हिंदू केस अगेन्स्ट पाकिस्तान’ ह्या शीर्षकाखाली आहेत. ‘ऐक्याचा बिमोड’, ‘संरक्षणाची दुर्बलता’, ‘पाकिस्तान आणि धार्मिक ऐक्य’ ह्या प्रकरणात पाकिस्तान निर्मिती च्या विरोधात हिंदूंची बाजू मांडलेली आहे.

पुढे ‘पाकिस्तान नाही झाले तर’ ह्या शीर्षकाखाली तीन प्रकरणे आहेत. यात पाकिस्तान चा पर्याय हा हिंदू आणि मुसलमानांच्या दृष्टीकोनातून दिलेला आहे.

शेवटची तीन प्रकरणे ही ‘पाकिस्तान निर्मितीची अस्वस्थता’ ह्या शीर्षकाखाली आहेत. यात सामाजिक बाबी, जातीय तेढ, राष्ट्रीय वैफल्य, या विषयांचा ऊहापोह केलेला आहे. आणि सर्वात शेवटी या संपूर्ण ग्रंथाचा गोषवारा त्यांनी उपसंहारात दिलेला आहे.

हे पुस्तक अनेक अर्थाने महत्वाचे आहे. बाबासाहेबांसारख्या कुशाग्र बुध्दिच्या माणसाने, हिंदू-मुस्लिम प्रश्नावर सांगोपांग विचार करून, विवेचन करून लिहिलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एखाद्या हिंदुत्वनिष्ठ चिंतकाने लिहिलेला नाही. तेंव्हा यात एकांगी विचार येण्याचा प्रश्नच नाही. उलट त्यांनी हिंदू धर्मावर अनेकदा प्रखर टीका केलेली आहे. त्यामुळे भारताचे संविधान बनविणाऱ्या, अत्यंत संयमित विचारांच्या माणसाने हा ग्रंथ लिहिलेला आहे, हे महत्वाचे आहे.

यात बाबासाहेब लिहितात, ‘भारतात हिंदू – मुसलमान एकता कधीच नव्हती. मुसलमान हे नेहमी शासक म्हणून भारतात राहिलेले आहेत, त्यामुळे ते त्याच मानसिकतेत सतत वावरत असतात. १८५७ चं ‘बंड’ हे देखील हिंदू – मुस्लिम ऐक्याचं उदाहरण नव्हतं, तर मुसलमानांनी आपली गेलेली ‘शासकाची’ भूमिका परत मिळविण्यासाठी ब्रिटीश सत्तेविरुध्द केलेलं हे बंड होतं. बाबासाहेब मुस्लिम धर्मा विषयी सविस्तर लिहितात – ‘मुसलमानांमध्येही समता नाही. त्या धर्मात स्त्रियांना वाईट वागणूक मिळते. मुसलमानांशिवाय अन्य ते सारे काफिर आणि या काफिरांना मुस्लिम देशात / समाजात अत्यंत हीन वागणूक मिळायला हवी, हे त्यांच्या धर्मातच लिहिलंय.’ या संदर्भात बाबासाहेब अनेक उदाहरणं देतात. अगदी तैमूरलंगाचं उदाहरण ही दिलेलं आहे, ज्यात त्याने केलेल्या बर्बर अत्याचारांचं वर्णन आहे.

मग अश्या मुसलमानांसोबत हिंदुंचं ऐक्य शक्य आहे का..? असेल तर ते कसे..? या संदर्भात या पुस्तकाच्या उपसंहारात बाबासाहेब लिहितात, ‘हिंदू – मुस्लिम ऐक्य हे अनुनय (appeasement) किंवा तडजोड (settlement) याच दोन मार्गांनी शक्य आहे.’ (If Hindu – Moslem unity is possible, should it be reached by appeasement or settlement..? – Chapter IV, Page 264).

ह्यात आलेला अनुनय (appesement) हा शब्द बाबासाहेबांनी मुसलमानांच्या संदर्भात, या ग्रंथात अनेक वेळा वापरला आहे. ‘कॉंग्रेस हा पक्ष मुसलमानांचा अनुनय (लांगुलचालन) करतो, जे देश हिताला घातक आहे.’ हे म्हणताना बाबासाहेब लिहितात –
Congress has failed to realize is the fact that there is a difference between appeasement and settlement and that the difference is an essential one (Chapter IV, Page 264).

याच प्रकरणात बाबासाहेब ‘अनुनय’ ह्या शब्दाची व्याख्या करतात. ते लिहितात –
‘अनुनय (लांगुलचालन) म्हणजे आक्रामकाचे हृदय जिंकण्यासाठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे’’ (Appeasement means to offer to buy off the aggressor bu convincing at or collaborating with him in the rape, murder and arson on innocent Hindus, who happen for the moment to be the victims of his displeasure).

बाबासाहेब पुढे लिहितात –
Appeasement sets no limits to the demands and aspirations of the aggressor. अर्थात ‘कितीही अनुनय केला, आक्रामकाचे कितीही लांगुलचालन केले तरीही त्याच्या मागण्यांची सीमा नसते’.

जिन्नांच्या मागण्यांच्या संदर्भात बाबासाहेबांचे म्हणणे फार रोखठोक आहे. ते लिहितात –
‘जेंव्हा जिन्ना म्हणतात, मुसलमान हे वेगळे राष्ट्र आहे, तेंव्हा त्यांच्याशी भांडण्यात काही अर्थ नसतो. जेंव्हा जिन्ना म्हणतात, मुसलमानांना तर पाकिस्तान हवेच, कारण ते स्वतः एक स्वतंत्र राष्ट्र आहे, तेंव्हा मी म्हणतो, तुम्ही हिंदू लोकांच्या एका मोठ्या समूहाला घेऊन पाकिस्तान बनवू शकत नाही. कारण तुमच्याच सिद्धांताप्रमाणे ते ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर – लेखन आणि व्याख्याने / खंड १७ / पुष्ठ ३२६)

येथे बाबासाहेब फार आग्रहाने लोकसंख्येच्या अदलाबदली चे प्रतिपादन करतात. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात सर्व मुसलमान आणि हिंदुस्तानात सर्व हिंदू ही त्यांची आग्रही भूमिका आहे आणि त्यांनी ठाम पणे ती मांडली आहे.

बाबासाहेबांची ही भूमिका पुढेही कायम राहिली आहे. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना २० जुलै, १९४७ चे त्यांचे प्रकाशित झालेले वक्तव्य आहे –
‘बंगाल आणि पंजाब चे विभाजन हा फक्त त्या प्रांतातील स्थानिकांचा प्रश्न नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. या प्रांतांच्या सीमारेषा ठरविणे हे संरक्षण आणि व्यवस्थापन या आधारावरच शक्य आहे. लोकसंख्येची अदलाबदली हे तत्व कॉंग्रेस ने आणि मुस्लिम लीग ने मानले असते तर ह्या समस्या निर्माण झाल्याच नसत्या. (खंड १७ / पृष्ठ ३५५).

पुढे ५ जून, १९५२ ला अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही मानद उपाधी दिली. ह्या प्रसंगी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘अमेरिकेतील सामान्य जनता पाकिस्तान मुळे प्रभावित आहे. अमेरिका ही पाकिस्तान कडे झुकलेली आहे.’

बाबासाहेबांनी १९३६ मधे धर्मांतराची घोषणा केली होती. दरम्यान त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. त्या काळात ‘हैदराबाद संस्थान च्या नवाबाने त्यांना मुस्लिम धर्मात येण्या संबंधी काही कोटी रुपयांचे आमिष दिले होते’ असे धनंजय कीर यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या चरित्रात म्हटले आहे. मात्र पुढे बाबासाहेबांचा कल बौध्द धर्माकडे गेल्यावर त्यांनी ‘इस्लाम आणि बौध्द’ संबंधांवर बरेच विवेचन केलेले आहे. इस्लामी आक्रमकांनी किती पाशविक पद्धतीने बौध्द भिक्खुंचा नाश केला, बुध्द विहारांना उध्वस्त केले या बद्दल सविस्तर लिहिले आहे. बाबासाहेब लिहितात, ‘बुत शिकन या शब्दाला मुस्लिम धर्मात आदराचे स्थान आहे. याचा अर्थ ‘मूर्ती फोडणारा’ असा होतो. यात ‘बुत’ हा ‘बुध्द’ शब्दाचा अपभ्रंश आहे.

बौध्द धर्म संपविण्यात मुस्लिम आक्रमकांचा मोठा वाटा आहे, असे बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी म्हटलेले आहे.

पाकिस्तान आणि इस्लाम संदर्भात बाबासाहेबांची ही अशी सरळ आणि सुस्पष्ट भूमिका आहे. यात कुठेही संभ्रम नाही, की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भूमिका बदलणे नाही. हिंदू – मुस्लिम सह अस्तित्व शक्य नाही आणि म्हणूनच भारताची फाळणी योग्य आहे, असे सरळसोट प्रतिपादन आहे.

आजच्या संदर्भात मागे वळून बघितलं की फाळणी संबंधी बाबासाहेबांची भूमिका पटेल किंवा पटणार नाही, पण त्याचे द्रष्टेपण बघून मन थक्क होते...!
- प्रशांत पोळ'

प्रशांत पोळ

आयटी क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव. विविध मोठ्या कंपन्यांसाठी आयटी कन्सल्टंट. 'भारतीय ज्ञानाचा खजिना' या पुस्तकाचे लेखक. भारतीय इतिहासावर गहन अभ्यास. साहित्य, संस्कृती, इतिहास, तंत्रज्ञान या विषयावर लेखनाची आवड. हिंदुत्ववादी विचारधारा जोपासणारे लेखक. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121