तळागाळातून वर आलेले रांगडे नेतृत्व म्हणजे काय, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. आजकाल साध्या नगरसेवकापासून बोकाळलेल्या व्हीआयपी संस्कृतीत, सामान्य कार्यकर्त्यांसोबत मिरवणुकांमध्ये नाचणारा, लेझीम फिरवणारा, गुलाल उधळून घेणारा महाजन यांच्यासारखा नेता अपवादानेच सापडतो. युट्यूबवर ‘गिरीश महाजन’ असे सर्च केल्यास पहिला व्हिडिओ येतो तो म्हणजे, ‘गिरीश महाजन- रिअल सिंघम ऑफ पीपल’ या नावाचा! हा व्हिडिओ पाहिल्यावर गिरीश महाजन हे रांगडे नेतृत्व का त्याची उत्तरं मिळत जातात.
गिरीश महाजन यांची राजकीय कारकीर्द ही जामनेर ग्रामपंचायतीपासून सुरू झाली. त्यामुळे ‘ग्रामपंचायत ते विधानसभा ते मंत्री’ असा प्रवास झाल्याने राजकारण आणि प्रशासनाचा खालपासून ते वरपर्यंतचा अनुभव महाजन यांच्या गाठीशी आहे. भाजप युवा मोर्चाचे जामनेर तालुका अध्यक्ष (१९८८) म्हणून महाजनांच्या संघटनात्मक कामाला सुरुवात झाली. १९९३ मध्ये वयाच्या ३३व्या वर्षी महाजन जामनेरचे सरपंच झाले आणि त्यानंतर १९९५ मध्ये महाजन पहिल्यांदा जामनेरचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले, ते १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे एकूण पाच वेळा महाजन आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान, संघटनात्मक पातळीवर भाजप जळगाव जिल्हा उपाध्यक्ष (१९९३-९५), भाजप प्रदेश सरचिटणीस (२००३), भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष (२००६), भाजप प्रदेश उपाध्यक्ष (२०११ ते २०१४) अशी विविध पदे महाजन यांनी भूषविली. २०१४ साली केंद्रात आणि राज्यात ऐतिहासिक सत्तापरिवर्तन झाले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्याची धुरा सोपविण्यात आली. तसेच नाशिक आणि नंदूरबार या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून कार्यभार देण्यात आला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार व फेररचनेत महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण खातेदेखील सोपविण्यात आले.
जलसंपदा खात्याची आधीच्या सरकारच्या काळातील प्रतिमा अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे डागाळलेली होती. त्यामुळे मंत्री म्हणून कामसुरू करण्यापूर्वी खात्यातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी निपटणे हे एक मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर होते. अनेक प्रकल्प रखडले होते, प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित होते. महाजन यांनी खात्यातील बजबजपुरीला पायबंद घालण्याबरोबरच या प्रकल्पांना गती देण्याचे कामप्रभावीपणे केले. नुकताच घेण्यात आलेला आघाडी सरकारच्या काळात राज्यातील १४ कलंकित आणि संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या प्रकल्पांच्या ९४ निविदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हे याचे उत्तमउदाहरण. यातून अनेक वर्षांच्या अनियमिततेला पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोसीखुर्दसारख्या महत्त्वाकांक्षी; परंतु वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ‘जलयुक्त शिवार‘सारख्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. तिची अनेक जलतज्ज्ञांनी दाखल घेतली, कौतुक केले. त्यामुळे जलसंपदासारख्या खात्याची धुरा पेलण्याचे आव्हान महाजन यांनी समर्थपणे पेलल्याचे दिसून आले.
राज्य मंत्रिमंडळात मंत्री होण्यापूर्वी जामनेरचे आमदार म्हणून कामकरत असताना महाजन यांच्या नावावर जी अनेक जनहिताची कामे जमा आहेत, त्यातील एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघुर धारण ते जामनेर दरम्यानची सुमारे ४० किमी लांबीची पाईपलाईन. महाजन यांनी पुढाकार घेतल्याने २०१३ मध्ये केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. या कामामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणार्या जामनेरला आज उन्हाळ्यातही शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे मिळते. वाघुर धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाजन यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांना पूर्ण मोबदला मिळू शकला. तसेच नैसर्गिक डोंगरउतारांवर नदीचे पाणी वळवून तब्बल ९० हून अधिक बंधार्यांचे बांधकाममहाजन यांच्या कार्यकाळात झाले. आजमितीस जामनेर तालुक्यातील ९० टक्के रस्ते हे पक्के रस्ते आहेत. तसेच २३ लहान-मोठे पूल महाजन यांच्या कार्यकाळात बांधले गेले आहेत. जामनेरमधील तरुणांचे शिक्षण व रोजगार यासाठी महाजन यांनी अनेक वर्षे वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, वेळ पडल्यास स्वतःच त्याचा खर्च उचलणे, त्यांना नोकर्या आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टी गेली अनेक वर्षे महाजन करत आहेत.
सामाजिक क्षेत्रात कामकरत असताना विशेषतः आरोग्य सेवेत गिरीश महाजन यांनी अनेक वर्षे काम केले. ‘आरोग्यदूत’ अशी गेली अनेक वर्षे त्यांची ख्याती. मंत्री होण्याआधी आमदार म्हणून जामनेरमध्ये काम करत असताना आरोग्य क्षेत्राकडे महाजन यांनी विशेष लक्ष दिले. तालुक्यात कुठेही अपघात झाला तरी महाजनांच्या कार्यालयात तातडीने फोन येई आणि अक्षरशः अपघात झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक अपघातस्थळी पोहोचण्याआधी महाजनांकडून मदत तेथे पोहोचलेली असे. रुग्णांना साहित्य वाटप, उपचार खर्च, रुग्णवाहिका सेवा आदी मदत गेली अनेक वर्षे महाजन सातत्याने करत आहेत. पहिल्या युती शासनाच्या काळात गरजू रुग्णांकरिता जीवनदायी योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाजनांनी आरोग्य शिबिरांद्वारे विशेष प्रयत्न केले. २००९ मध्ये जामनेर येथे झालेले आरोग्य शिबीर हे त्या वेळचे राज्यातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर होते. आरोग्य क्षेत्राबद्दल महाजन यांची ही आस्था त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार आल्यानंतरही लगेचच दिसून आली. राज्य शासनातर्फे नुकत्याच राबविण्यात आलेल्या ‘महाअवयवदान अभियाना’मधून आणि त्यातील विविध उपक्रमांमधून गरजूंकरिता जनतेला अवयवदानाचे महत्त्व सांगणारा एक सकारात्मक संदेश देण्यात आला.
व्यायाम आणि खेळ विशेषतः मैदानी खेळ हा गिरीश महाजन यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय. स्वतः महाजन यांना व्यायाम आणि मैदानी खेळांची लहानपणापासून विशेष आवड आहे आणि इतरांमध्येही ती गोडी निर्माण व्हावी, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मंत्री झाल्यानंतर एवढ्या धकाधकीच्या आयुष्यातही ते व्यायाम आदी गोष्टींकडे लक्ष देतात आणि इतरांशीही आपल्या या आवडीबद्दल भरभरून बोलतात. महाजन अनेक क्रीडा संघटनांमध्ये कार्यरत असून त्यांनी जामनेर तालुक्यातदेखील व्यायामशाळा बांधून व्यायाम, तंदुरुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात असल्याने वेळेची सतत भासणारी कमतरता, दौरे यामध्ये तब्येतीकडे लक्ष न दिल्याचा परिणाम अनेक नेत्यांकडे पाहून लक्षात येतो. गिरीश महाजन हे मात्र याला अपवाद ठरतात. महाजन यांचा पोशाख, देहबोली, त्यातून जाणवणारी तंदुरुस्ती यांच्यामागे जामनेरच्या मातीत वर्षानुवर्षे केलेला व्यायाम आणि मेहनत असल्याचे लगेच लक्षात येते. त्यामुळेच कदाचित खान्देशी जनतेला ‘सिंघम’ म्हटल्यावर गिरीश महाजन यांचे नाव घ्यावसे वाटते.
येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षांच्या कालावधीत सरकारने अनेक आरोपांचा धुरळा झेलला आहे, टीका आणि स्तुती अनुभवली आहे, अनेक पातळ्यांवर अनेक समस्यांशी लढा दिला आणि तो असाच पुढेही चालू राहील. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्यासारखे रांगडे नेतृत्व राज्य मंत्रिमंडळात असणे, ही या सरकारची एक मोठी जमेची बाजू ठरेल, यात शंका नाही.
- निमेश वहाळकर