वय अवघे पाच वर्ष, शाळेचा पहिला दिवस. बाईंचा पहिला प्रश्न... ‘बोलो बुधीया सुभेसे क्या किया बेटा’ बुधीया म्हणतो... ‘हागा और भागा!’ या उत्तरावरून तुमच्या लक्षात आलचं असेल की, या मुलाच्या आयुष्यात पळण्याशिवाय दुसर्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाहीये. ही कोणतीही काल्पनिक कथा नसून 2006 साली ओडीसा मध्ये घडलेल्या बुधीया सिंग नावाच्या पाच वर्षाच्या मुलाची कथा आहे. सौमेंद्र पाधी याने ती आपल्या पहिल्या-वहिल्या ‘बुधीया सिंग बॉर्न टू रन’ या चित्रपटातून अतिशय उत्तमरित्या साकारलेली दिसते.
गरिबीवर मात करण्यासाठी बुधीयाची आई एका सेल्समनला 800 रूपयांना बुधीयाची (मयूर पाटोळे) विक्री करते. ओडीसामधील ज्युडो कराटेची शाळा चालवणारा बीरांची दास (मनोज बाजपेयी) मात्र बुधीयाला त्या सेल्समनकडून पुन्हा सोडवून आणतो आणि आपल्या शाळेत दाखल करतो. एके दिवशी काही कारणास्तव बीरांची बुधीयाला ‘मी थांब असं सांगत नाही तो पर्यंत गोल पळत राहा’ अशी शिक्षा देतो आणि बाहेर निघून जातो. रात्री पुन्हा परत येतो तेव्हाही बुधीया पळतच असतो. त्याचबेळी तो बुधीयाची क्षमता ओळखतो आणि स्वप्न बघतो बुधीयाच्या ऑलिम्पिक सहभागाचे. तुला नवीन बुट देतो, नवी सायकल देतो अशी वेगवेगळी आमीशं दाखवून बीरांची बुधीयाला पळण्याचे ट्रेनिंग देत राहतो. दरम्यानच्या काळात पाच वर्षाचा असूनही बुधीया विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो तरीही त्याच्या या अद्भूत कलेची कोणीही दखल घेत नाही.
परंतु बीरांची हा स्वस्थ बसणार्यांमधील नसतो. बुधीयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बीरांची बुधीयाला ‘पुरी ते भुबनेश्वर’ असे 70 किमीचे अंतर पळवण्याचा निर्णय घेतो. बुधीया हा प्रवास पूर्ण करू शकतो का, पुढे बीरांचीचे काय होते आणि आज बुधीया सिंग कुठे आहे व काय करतोय या सर्व घटनांचे चित्रण दिग्दर्शकाने अतिशय योग्यप्रकारे या चित्रपटातून केले आहे. ‘पुरी ते भुबनेश्वर’चा बुधीयाचा प्रवास हा खरतर या चित्रपटाचा आत्मा आहे. पहाटे साडेचार वाजता बुधीया पळायला सुरूवात करतो आणि त्याच्या प्रत्येक पुढील टप्प्यावर जनजीवन बदल जाते मात्र बुधीया पळतच राहतो. गाण्याच्या माध्यमातून हा प्रवास साकारल्याने तो अधिक अंगावर येतो. या प्रवासातील शेवटचा टप्पा तर काही सेकंद अंगावर काटाच आणतो. चित्रपटातील हा सीन सर्वात जास्त जमून आला आहे.
संपूर्ण चित्रपट केवळ बीरांची आणि बुधीया यांच्या भोवतीच फिरत राहतो. अनेकदा बीरांचीच वागण आपल्याला खटकत पण दुसर्याच क्षणाला आपल्या मनातील ते बोच दिग्दर्शकाने अगदी अलगदपणे खोडून काढली आहे. आपल्या देशात राजकारणाला कोणतेही क्षेत्र अपवाद नाहीये हे या चित्रपटातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. क्षमता असूनही केवळ राजकारण करण्याच्या दुष्ट प्रवृत्तींमुळे आपला देश आजही मागे राहीला आहे. किमान या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतरतर बुधीया सिंगला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
मनोज बाजपेयी म्हणलं की अभिनयाची पातळी उच्च दर्जाचीच असते आणि या चित्रपटातही ती तशीच आहे. मयुर पाटोळेचीही बुधीयाच्या व्यक्तिरेखेसाठी अचूक निवड केली आहे, त्याच्या अभिनयाचेही विशेष कौतुक! राजन भिसे, श्रृती मराठे यांच्यासारखे मराठी चेहरेही आपली वेगळी छाप पाडून जातात. दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात सौमेंद्रने बाजी मारलीये. बुधीयाच्या आयुष्यात जे घडले ते कोणत्याही मसाल्याशिवाय दाखविल्यामुळे ते अधिक भावते. चित्रपटातील गाणीही कथेमध्ये एक वेगळ्याप्रकारची रंगत आणतात.
‘जितना जादा रोकोंगे, उतना जादा दौंडुंगा’ असं बुधीया सिंग म्हणतो खरं पण त्याचे पाय नियमांमध्ये बांधून ठेवल्याने तो मनात असूनही आत्ता असं करू शकत नाहीये याची खंत वारंवार आपल्याला बोचत राहते. बुधीयाच्या निर्विवाद क्षमतेला सलाम करण्यासाठी आणि त्याचे अपूर्ण राहीलेले ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘बुधीया सिंग-बॉर्न टू रन’ हा चित्रपट सर्वांनी एकदा तरी जरूर पाहावा..!