महामानव चाणक्य

    05-Dec-2016   
Total Views |


दोन दिवस सुटी होती आणि घरीच होतो. यू ट्यूब सर्फ करता करता २०१२ साली एनडीटीव्ही इमॅजिन वरच्या चंद्रगुप्त मौर्यचे एपिसोड्स मिळाले. चंद्रगुप्त तरुण असतानाच्या एका एपिसोडपासून सुरवात केली आणि सलग एकामागोमाग एक १५-२० एपिसोड्स कोणत्याही व्यत्ययाशिवाय बघून काढले. मजा आली. ज्या वेळी हि मालिका टीव्हीवर चालू होती तेव्हा पाहिली नव्हती आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदिंची मालिका जेव्हा दूरदर्शनवर लागत असे तेव्हा ती समजत नव्हती. ह्या एपिसोड्सच्या निमित्ताने चाणक्य ह्या महामनुष्याची महती पुन्हा एकदा ठळक झाली.

मराठी माणसासाठी इतिहास हा शिवाजी राजांपासून चालू होतो. थोडं मागे गेलं तर मालोजी राजे वगैरे, त्या आधी नामदेव महाराज, नामदेव महाराजांच्या आधी इसवीसन १२०० मध्ये ज्ञानोबा माऊली आणि त्या आधी इसवीसन ९८०च्या आसपास सापडलेला पहिला मराठी शिलालेख. ज्ञानोबा आणि शिवाजी राजे ह्यांचा मधला कालखंड तोंडओळख ह्या सदरात मोडणारा. भारताच्या इतिहासात रामदेवराय, कृष्णदेवराय, अल्लादिन खिलजी आणि सन ८०० च्या सुमारास श्रीमद आद्य शंकराचार्य. त्याआधी इतिहासात काही फारसं चांगलं किंवा घसघशीत घडलं नसावं किंवा आहे त्यावर फारसं संशोधन झालं नसावं. कदाचित म्हणून सम्राट अशोक ते शंकराचार्य हा जवळजवळ ९०० ते १००० वर्षांचा कालखंड आपल्यापैकी बहुतांश जनतेसाठी अपरिचित आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य ह्यांचा काळ आजपासून २३०० वर्षांपूर्वीचा आहे आणि आजही जनमानसात पकड कायम करून आहे.

चाणक्याच्या वडिलांचं नाव चणक आणि आईचं नाव चाणकी असल्यामुळे त्यांचं नाव चाणक्य ठेवलं गेलं असा एके ठिकाणी उल्लेख आहे. विष्णूगुप्त म्हणून ते प्रसिद्ध होतेच. त्यांचं एकही अधिकृत चित्र उपलब्ध नाही. चित्रकारांनी कथांवरून स्वातंत्र्य घेत त्यांची जी चित्रं काढली आहेत त्यात बऱ्याच ठिकाणी चाणक्य हे आततायी, चिडके आणि तिरसट दाखवले आहेत.  पण खरोखर चाणक्य असे असतील का हा प्रश्न पडतो. शिस्तप्रिय आणि ध्येयवादी जरी असले तरी तापट नक्कीच नसतील. कारण त्याशिवाय इतक्या प्रचंड जनसमुदायावर गारुड राखणं शक्य वाटत नाही. ते एक 'बेस्ट ओरेटर' ते नक्कीच असतील.

चाणक्य हे शिक्षक होते. प्रचंड बुद्धिमत्ता आणि स्वदेशाबद्दल, स्वकीयांबद्दलची आस्था हेच त्यांचं भांडवल होतं. धनानंदाकडून झालेल्या अवमान प्रसंगानंतर चंद्रगुप्त हा हिरा त्यांनी शोधून काढला आणि त्यावर संस्कार केले. त्यांच्या भेटीच्या वेळी चंद्रगुप्त अगदी चौदा वर्षांचा होता असं मानलं तरी त्यावर मेहेनत घेऊन तो तरुण झाल्यावर त्याकरवी धनानंदाचं साम्राज्य उलथवण्यासाठी लागणारे 'पेशन्स' त्यांच्याकडे होते. आपल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी एखाद तप थांबण्याची त्यांची तयारी होती. हातात काहीही नसताना एक मोठी झेप घेण्यासाठी लागणारा मोठा 'रिस्क अपेटाईट' त्यांचा नक्कीच होता.

धनानंदाच्या विरुद्ध केलेल्या दोन कारवायांमध्ये चाणक्य आणि चंद्रगुप्त ह्यांना अपयश आलं होतं. हातचं सर्व गमावून पुन्हा एकदा त्यांना शून्यातून सुरवात करायची होती. गंधारच्या राजाचा पराभव करून त्यांनी त्यांचा 'ऑल्टरनेट प्लान' राबवला. दोन पावलं मागे जावं लागलं म्हणून डोक्यात असलेल्या योजनेचा कधी त्याग केला नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवून दाखवलंच. यश प्राप्ती साठी लागणारी 'परसिस्टन्सी' त्यांच्याकडे होती.

अलेक्झांडर येतोय, तो एकेक करत आपली गणराज्य बुडवेल आणि भारत देश गिळंकृत करेल. त्यासाठी एकत्र यायला हवं. तो केवळ आपला देश बुडवणार नाही, आपली संस्कृती नष्ट करेल. परकीय आक्रमणं हि केवळ भौगोलिक वा आर्थिक नसतात, त्यांचा परिणाम संस्कृतीवर फार खोल होत असतो आणि म्हणून एतद्देशियांनी एकत्र येऊन अलेक्झांडरचा पराभव करायला हवा हि 'फोरसाइट' त्यांच्याकडे होती.

वेद वा इतर धर्मशास्त्राशी संलग्न नसलेली राज्यकारभाराची पद्धत प्रस्थापित करण्याचा मान हाही चाणक्यांकडे जातो. त्यासाठी लागणारं 'इनोव्हेशन' आणि 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार त्यांच्याकडे होता. तेराव्या शतकात ब्रिटनमध्ये लिहिल्या गेलेल्या 'मॅग्ना कार्टा'ला राज्यघटनेचा पहिला प्रयोग असं मानलं जातं. मात्र 'मॅग्ना कार्टा'च्या एक हजार वर्षं आधी राज्यशासन चालवायची फुल प्रूफ पद्धत चाणक्यांनी 'कौटिलीय अर्थशास्त्र' ह्या त्यांच्या ग्रंथात मांडली. अकबराला एक चांगला कुशल प्रशासक मानलं जातं, मात्र त्याच्या सतराशे वर्षं आधी चंद्रगुप्त हा अखंड भारताचा कुशल प्रशासक झाला. सोपं उदाहरण म्हणजे भारतात पहिला राष्ट्रीय महामार्ग (नॅशनल हायवे) बांधण्याचं काम चंद्रगुप्ताने केलं होतं. तक्षशीला (आजचा पाकिस्तान) ते मगध (बिहार) हा पहिला महामार्ग चंद्रगुप्ताने उभारला. आजही तो ग्रँड ट्रंक रोड (जी टी रोड) म्हणून ओळखला जातो.

सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्रगुप्त वा चाणक्य ह्यांना कुणी देवाचा अंश वगैरे उपाधी कधीही चिकटली नाही. त्यांचं कर्तृत्व हे देवाचा अंश ह्या उपाधीत कधी झाकोळलं गेलं नाही. सर्वसामान्यांसारख्याच शाररिक मर्यादा, मर्यादित आयुष्यमान त्या दोघांनाही होत्या. मर्यादा नव्हती ती त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेला, अफाट कर्तुत्वाला आणि अचाट महत्त्वाकांक्षेला!! दुर्दैवाने कृष्णदेवरायचा पराभव, पानिपतात मराठयांचा पराभव, अकबराकडून महाराणा प्रतापाचा पराभव, राणी पद्मिनीचा जोहार हि एकच बाजू आपल्याला शिकवली गेली. अलेक्झांडरचा पुरु राजाने केलेला पराभव आपल्याला कुणी शिकावलाच नाही ना सम्राट पुष्यमित्राच्या पराक्रमाच्या गाथा आपण कधी ऐकल्या.

चाणक्य आणि चंद्रगुप्त हे इतिहास आहेत, पुराण नाही. भारतीयांच्या पराभवाचा इतिहास मांडताना आपल्याकडच्या इतिहासकारांची जीभ थकत नाही, मात्र दुर्दैवाने ह्या महत्पुरुषांचा गुणगौरव क्वचित आढळतो.

माझा चाणक्य ह्या विषयात इतिहासाच्या दृष्टीने अभ्यास नाही. गंधार नरेश अंभिकचा पाडाव किती साली झाला, व्यास (आजची बियास) नदी नक्की किती सैन्यानिशी पार झाली, चाणक्याविरुद्धच्या कारस्थानात भद्रासाल आणि अमात्य राक्षस ह्यांच्यासोबत अजून कोण होतं हे मी सांगू शकणार नाही. परंतु गेली काही वर्षं कॉर्पोरेट जगात काम केल्यावर चाणक्य चरित्र अनेक ठिकाणी रिलेट करण्यासारखी वाटू लागली आहे. इतिहासातल्या घटना त्या त्या व्यक्तीच्या पराक्रमाचं मूर्त रूप असतं. ती व्यक्ती त्या मूर्त रूपाच्या फार फार पलीकडे असते. चाणक्याच्या ह्या दुसऱ्या रूपाचा यथामती शोध घ्यायचा हा एक अल्प प्रयत्न!

- सारंग लेले

अग्रलेख
जरुर वाचा
गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून, पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच नवीन झाडे लावून होणारी हानी भरून काढण्यात येणार आहे, त्यामुळे ‘एक लाख झाडांची कत्तल’ ही माध्यमातून प्रसिद्ध होणारी माहिती वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे. ‘लॉई..

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोलीत एक लाख झाडे तोडणार हे धादांत खोटे! , - वनविभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोहखनिज प्रकल्पाला परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून, पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्याने काम करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. तसेच नवीन झाडे लावून होणारी हानी भरून काढण्यात येणार आहे, त्यामुळे ‘एक लाख झाडांची कत्तल’ ही माध्यमातून प्रसिद्ध होणारी माहिती वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणारी असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे. ‘लॉई..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121