नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोकणात शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस यांना संमिश्र यश मिळाले आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात कोकणातील काही भागात शिवसेना-भाजपच्या पारंपारिक गडांना धक्के देत राष्ट्रवादीने बऱ्यापैकी पाय रोवायला सुरुवात केली असल्याचे चित्र होते. मात्र २०१४ पासून हे चित्र पुन्हा बदलण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या नगरपालिका निवडणुकीतील याचे ठळक उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषद निकाल.
राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या या नगरपालिकेत शिवसेना प्रथम क्रमांकावर आली. नगराध्यक्ष मात्र भाजपचा निवडून आला. आणि २०११ पासून क्र. १ वर असणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. या निकालात राष्ट्रवादीला धक्का बसणार हे नक्की होते मात्र पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर जाईल आणि कॉंग्रेसपेक्षाही कमी जागा मिळतील हे अनपेक्षित होते. पक्षाच्या या दारूण पराभवामागे माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सध्या नाराज असलेले नेते आमदार भास्कर जाधव यांचाच हात असल्याची सध्या चर्चा आहे. भास्कर जाधव हे सध्या गुहागरमधून निवडून येत असले तरी चिपळूण हीच त्यांची कर्मभूमी आहे. चिपळूणमधूनच ते शिवसेनेत असताना निवडून आले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष, मंत्रीपद मिळवून राज्यभर घिरट्या घालणाऱ्या जाधवांचे लक्ष सदैव चिपळूणकडेच राहिले. चिपळूणमधील राष्ट्रवादीचे तगडे नेते व माजी आमदार रमेश कदम यांची चिपळूण शहर राष्ट्रवादीवर आणि कदम गटाची चिपळूण नगरपालिकेवर मजबूत पकड होती. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांचे आपापसातील ‘सख्य’ सर्वश्रुत आहे. चिपळूणची जबाबदारी यावेळी कदमांकडे सोपवण्यात आल्याने जाधव यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. जाधवांच्या नाराजीचा फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसणार ही सर्वांचीच अटकळ होती आणि त्याप्रमाणेच घडले. राष्ट्रवादीचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला.
राष्ट्रवादीच्या या धूळधाणीमागे भास्कर जाधवांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. जाधव पक्षाच्या प्रचारात अजिबात सक्रीय नव्हते, त्यांचा गटही अलिप्त होता. त्यांचे अनेक समर्थक इतर पक्षांमध्ये जाऊन त्यांच्या तिकिटावर लढले. शिवाय जाधवांनी शिवसेनेला ‘आतून’ मदत केली, असे चिपळूण शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘तुम्हाला हवे तिथे तुम्ही जा, मी तुम्हाला अडवणार नाही’ असे जाहीरपणे सांगत आपली पुढची दिशा स्पष्ट केली होती. तसेच जाधव यांची भाजप प्रवेशासाठी भाजपच्या नेत्यांशी प्राथमिक बोलणी झाली असल्याचीही चर्चा होती. शिवाय जाधव आणि रमेश कदम यांच्यात जाहीरपणे एकमेकांवरील आरोपबाजी चालूच होती. याचाच परिणाम पक्षाला चिपळूणमध्ये भोगायला लागला आहे. ‘राष्ट्रवादीतील गटबाजीच्या या परिणामांची ही फक्त सुरुवात असून आणखी बरेच मोठे धक्के सहन करावे लागणार आहेत’ अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.
आता भास्कर जाधव पुढची चाल काय खेळतात याकडे कोकणासह राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका निवडणुकीतील जाधवांनी बजावलेली पक्षविरोधी भूमिका हे आता चिपळूणमधील ‘ओपन सिक्रेट’ बनले आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून गेला महिनाभर चालू असलेल्या या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. २०११ पाठोपाठ या निवडणुकीतही भास्कर जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रवादी अंतर्गत याची मोठी प्रतिक्रिया उमटणार हे निश्चित. जाधव यांची पुढची वाटचाल भाजपकडे की शिवसेनेकडे याबाबत मात्र उलटसुलट चर्चा चालू आहे. मात्र जाधव पक्षातून बाहेर पडल्यास रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. सध्यातरी आपण काय करू शकतो हे नगरपालिका निवडणुकीतून दाखवून देत भास्कर जाधव यांनी पक्षनेतृत्वाला सूचक इशारा दिला असल्याचे दिसून येते आहे.
निमेश वहाळकर