ह्या वेळच्या मे महिन्यात काश्मीरला फिरायला गेलो होतो. श्रीनगरला आमच्या सगळ्या ग्रुपचा होम स्टे होता. मकबूल भाई (नाव बदललं आहे) नावाच्या तिथल्याच एका स्थानिक माणसाचं घर होतं. होम स्टे म्हंटल्यावर थोडे साशंक होतोच. हवी तशी व्यवस्था असेल की नाही, सोय चांगली असेल की नाही ह्याबद्दल शंका होती.
मात्र तिथे पोचल्यावर आमची शंका खोटी ठरली. स्वच्छ रूम्स, चांगली माणसं, नाश्त्याला अगदी आपल्या महाराष्ट्रीयन उपमा पोह्यापासून ते जेवणात टिपिकल काश्मिरी पदार्थ असलेलं चविष्ठ जेवण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तम आदरातिथ्य व चांगली माणसं. काश्मीरातल्या त्या घरातल्या सर्वांचंच वागणं बोलणं फार लाघवी आणि मृदू होतं.
हि गोष्ट मे महिन्यातली आहे आणि आतापोवेतो पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. मकबूल भाईची मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. त्याची प्रोफाइल बघताना त्याच्या मित्रयादीतल्या लोकांच्याही प्रोफाईल्सवर मी चक्कर टाकली. पाकिस्तान आणि स्वतंत्र काश्मीरला पाठिंबा देणारे बरेच लोकं मकबूलभाईच्या मित्रयादीत आहेत. साहजिकच अश्या लोकांशी मैत्री करण्यात मला शून्य इंटरेस्ट आहे.
काश्मिरात घडत असलेल्या घटनांना स्थानिकांचा बऱ्यापैकी पाठिंबा आहे. त्या स्थानकांमध्ये मकबूल भाई देखील कदाचित असू शकेल. अगदी सक्रिय नसला तरी नैतिक पाठिंबा असल्याची शक्यता नाकारण्यात येऊ शकत नाही. मकबूलभाईने मे महिन्यात आमच्या मनात जी विश्वासार्हता कमावली होती ती आता अजिबात राहिली नाहीये. एकतर त्याचं आमच्याशी असलेला व्यवहार खोटा होता किंवा आम्ही त्याला ओळखायला चुकलो होतो.
माझ्या मागोमाग माझ्या ऑफिसचा एक सहकारी त्याच्या कुटुंबासोबत जून महिन्यात काश्मीरला जाणार होता. बुऱ्हाण वाणीच्या प्रकरणानंतर काश्मीरमध्ये अशांतता पसरली आणि त्याने आपला बेत रद्द केला. हे एक प्रतिनिधिक उदाहरण झालं. गेल्या चार महिन्यात हजारो पर्यटकांनी आपले बेत रद्द केलेत.
काश्मीरमध्ये मार्च अखेर ते नोव्हेम्बर हा पर्यटकांचा मौसम असतो. गेली काही वर्षं काश्मीर खोऱ्यात पर्यटनासाठी आकर्षण असलेल्या ठिकाणी शांतता आहे. भारतीय सैन्य, सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलीस दल ह्यांचा हि शांतता राखण्यात मोठा वाटा आहे.
काही छोट्या इंडस्ट्रीज सोडल्या तर शेती, पर्यटन आणि पारंपारिक कला हे काश्मीरमधले प्रमुख व्यवसाय आहेत. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत सुमारे ५३% वाटा हा सेवासुविधा (सर्व्हिसेस) ह्या क्षेत्राचा आहे. २५% उत्पादन ( मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राचा तर आहे तर २२% वाटा शेती व संबंधित व्यवसायाचा आहे.
गम्मत म्हणजे ह्यासर्वाशी संबंधित संबंधित असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण ह्या वाट्याशी मिळतंजुळतं नाही. ६४% जनता शेती करते मात्र त्यांचा अर्थव्यवस्थेत वाटा फक्त २२% आहे. सेवा क्षेत्रात २५% जनता आहे तर त्यांचा उत्पन्नाचा वाटा ५३% आहे. थोडक्यात कमी लोकसंख्या कार्यरत असणाऱ्या क्षेत्रात उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. हे सर्व आकडे वाचायला क्लिष्ट असले तरी ते महत्वाचे आहेत.
जम्मू काश्मीर राज्याचा कर आणि इतर उत्पन्न धरून ह्या वर्षीचा बजेटेड रेव्हेन्यू ५१ हजार करोड रुपयांचा आहे आणि त्यात २७ हजार करोड रुपये केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी ग्रांट आहे. म्हणजे राज्याचे ५०% पेक्षा जास्त उत्पन्न हे केंद्र सरकारकडून येत आहे. सर्वसामान्य काश्मिरी आणि भारतातल्या इतर नागरिकांना हि गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. केंद्राकडून दिला जाणारा निधी सामान्य करदात्यांच्या खिशातला आहे, निदान ह्या कारणाकरिता का होईना, आपण सर्वांनी काश्मीर बाबत जागरूक असायला हवं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारकडून होणारी मदत हि फक्त श्रीनगरच्या पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी नसून ती बाराही महिने असते. शिवाय ह्यावर्षी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीत ह्यावर्षी घसघशीत २९%ची वाढ आहे.
बजेटेड रेव्हेनूत ५१ हजार करोडपैकी २७ हजार करोड केंद्राकडून येतात. आता उरले २४ हजार करोड. त्यापैकी ५३% म्हणजे जवळपास १२ हजार करोड हे सेवा क्षेत्रातून येतात. पर्यटन हा काश्मिरचा प्रमुख व्यवसाय. म्हणजेच ह्या क्षेत्रातून बऱ्यापैकी कमाई सरकार आणि सामान्य जनता करत आहे.
ह्या टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काश्मीरचे हजारो लोकं काम करतात. पोनी वाले, बॅट्स विकणारे, टुरिस्ट गाड्या चालवणारे, होम स्टे वाले, हॉटेल्स, स्लेज गाड्या चालवणारे, ड्राय फ्रुट्सची दुकानं असणारे, शिकारा वाले, बर्फ़ाळ भागात चहा कॉफी पासून बऱ्याच गोष्टी विकणारे, पश्मिना शाली, काश्मिरी नक्षीकाम केलेलं ड्रेस विकणारे, छोटे मोठे उद्योग चालवणारे असे अनेक. काश्मिरात पर्यटनाचा मौसम एप्रिल ते नोव्हेम्बर ह्या महिन्यांमध्ये असतो. वर्षभराची सर्व कमाई ह्या महिन्यांमध्ये असते. त्यानंतर बर्फ पडायला सुरुवात झाल्यावर सर्व व्यवसाय आणि व्यवहार ठप्प होतात. ह्यावर्षी ८ जूनला बुऱ्हाण वाणीचा वध भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आणि त्यानंतर काश्मीर धुमासायला सुरवात झाली. तेव्हा पासून आजपर्यंत काश्मीर धगधगत आहे. संचारबंदी, जमावबंदी काश्मीरला नवी नसली तरी इतका प्रदीर्घ काळ ती लागू राहणं हे फारसं चांगलं लक्षण नाही. समाधानाची बाब म्हणजे सरकार आता कोणत्याही परिस्थितीसमोर न झुकता कारवाई चालू ठेवून आहे.
गेल्या सहा महिन्यात पर्यटन व्यवसाय ठप्प झालाय. मौसमात ८० ते ९० टक्के असणारं हॉटेल्सचं बुकिंग आता जेमतेम ५% च्या आसपास आहे. आठवड्याला १० ते १२ हजार पर्यटकांची असणारी संख्या आता केवळ अडीचशे ते हजार इतपत खाली आली आहे. पर्यटनाचा हंगाम ह्यावर्षीसाठी आता संपला आहे.
वर दिलेली सर्व आकडेवारी लक्षात घेतली तर जून ते नोव्हेम्बर ह्या ऐन पर्यटनाच्या मौसमात कमीत कमी आठ ते दहा हजार करोड रुपयांचं नुकसान काश्मिरी जनतेने स्वतः च्या हस्ते करून घेतलं आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याची हि किंमत आहे. त्यातून आता ५०० व हजारच्या नोटा बंद झाल्यावर दगड फेकीतून मिळणारं 'साईड इन्कम' देखील बंद झालंय. तेलही गेलं, तूपही गेलं अशी अवस्था आता झालीय.
फुटीरतेच्या नादी लागून केलेल्या संघर्षातून केवळ नुकसान पदरात पडणार आहे. काश्मीरच्या जनतेने हा विचार करायची वेळ आता आलेली आहे. अन्यथा त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा तोटा फार मोठा असेल.
सारंग लेले