काही लक्षात येतंय का?

    11-Nov-2016   
Total Views |


जागतिक राजकारणाच्या पटलावर घडणार्‍या घटनांचे परिणामव पडसाद देखील जागतिकच असतात. दूरगामी व तत्काळ अशा स्वरूपाचे परिणामआपल्याला अशा घटना घडल्यावर पाहायला मिळतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले बांधकामव्यावसायिक डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकनच नव्हे, तर काही विशिष्ट भारतीय पत्रकारांच्या दृष्टीने खलनायकच होते. त्यांची जितकी नालस्ती निवडणुकीच्या काळात करून घेता आली तितकी त्यांनी केली होती. इंग्रजीतल्या काही पूर्ण हळकुंडाने पिवळ्या झालेल्या किंवा पूर्वग्रहाची कावीळ झालेल्या पत्रकारांनी अमेरिकन मतदारांनी आपला कौल देण्याच्या आधीच हिलरींना राष्ट्राध्यक्षदेखील करून टाकले होते. मराठीतील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अशाच एका संपादकाने तर थेट अमेरिका वारी करून जे काही तारे तोडले ते रंजकच म्हणावे लागतील. इंग्रजीतल्या एका महिला पत्रकाराने ज्या ठिकाणी उभे राहून हिलरी क्लिटंन उद्या आपले विजयाचे भाषण करतील त्या ठिकाणी उभे राहून स्वत:चा फोटो काढला. इतकेच करून ती थांबली नाही, तर ‘‘हा ऐतिहासिक क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला असून मला त्याचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली...’’ वगैरे अशा आशयाचे ट्विटदेखील केले. अमेरिकन माध्यमांनी तर डोनाल्ड ट्रम्प यांना निकालातच काढले होते. त्यांच्या निरनिराळ्या प्रकरणांची, दिवाळखोर उद्योगांची, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची भरपूर चर्चा या निवडणुकीत झाली. अमेरिकन निवडणुकीचा कधी नव्हे इतका हा दर्जा खालावल्याचे चित्र सार्‍या जगाने पाहिले. हा दर्जा इतका खाली गेला होता की, ट्रम्प यांची पुरूष इंद्रिये नसलेले नग्न पुतळे अमेरिकेत काही ठिकाणी लावले गेले. सुरुवातीपासूनच ट्रम्प चेष्टेचा भाग होते. माध्यमसमूहांनी यात पुरेपूर भाग घेतला. वार्तांकन आणि तथ्य पोहोचविण्याच्या पलीकडे जाऊन ट्रम्प यांच्या पराभवाची सुपारी घेतल्याप्रमाणेच ही आघाडीची अमेरिकन माध्यमे वागत होती. आपल्याकडचे इंग्रजाळलेले पत्रकारही यात मागे नव्हते. कमी अधिक प्रमाणात त्यांचेही असेच काहीसे उद्योग इथे सुरू होते. ट्रम्प चांगले की वाईट हा मुद्दा नाही. हिलरी उत्तमकी नगण्य हाही मुद्दा नाही. मुद्दा आहे सपशेल चुकलेल्या आणि तरीही त्याची जाणीव नसलेल्या माध्यमांचा. ही धोक्याची घंटा आहे. समाजातील घटनांचे वास्तव आपल्या माध्यमांमध्ये प्रतिबिंबित करण्याची जबाबदारी असताना माध्यमे मात्र एका अर्थाने हिलरी क्लिटंन यांच्या प्रचारमोहिमेत सहभागी झाली होती. आपला वाचक-ग्राहक यांचे भान माध्यमांनी बिलकुल ठेवले नाही. आपण सर्वात आधी त्याला उत्तरदायी आहोत, याचे भान माध्यमांनी ठेवले नाही. खरे तर मुद्दा खूप साधा होता. नागरीकरण म्हणून अमेरिका हे खूपच प्रगत राष्ट्र आहे. घटनादत्त अधिकार व समाजपद्धतीवर अमेरिकनांचा खूप विश्र्वास आहे. लहानशी हिंसक घटनादेखील अमेरिकनांना चिंतित करून जाते. अशा अमेरिकनांसमोर इस्लामी दहशतवादाचे संकट मोठे आहे. लोकशाहीतून मिळालेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर इस्लामी दहशतवादी अतिक्रमण करतात, याबाबत त्यांचे दुमत नाही. हिलरी, त्यांची मोहीमचालविणारे आणि अमेरिकन माध्यमे यांची गफलत झाली ती नेमकी इथेच. हिलरींनी शेवटपर्यंत इस्लामी दहशतवादाचा मुद्दा आघाडीवर येऊन हाताळला नाही. हरल्यानंतरच्या आभाराच्या भाषणातही उपासना पद्धतीच्या स्वातंत्र्याचे जुनेच तुणतुणे त्यांनी वाजविले. अमेरिकनांना उपासनापद्धतीच्या स्वातंत्र्याचे वावडे मुळीच नाही. मात्र, उपासना पद्धतीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मांध मुस्लिमांनी जगभर जो काही नंगानाच चालविला आहे त्याबाबत सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाला चिंता आहेच. अत्यंत व्यक्तिकेंद्रित आणि या व्यक्तिकेंद्रित्वातूच अन्य मानवी मूल्यांचा आविष्कार घडविणार्‍या या समाजाला ट्रम्प भावले ते यामुळेच.

इस्लामी दहशतवादाचा मुद्दा ट्रम्प यांनी सरळ हाताळला. आपल्या प्रचारसभांत त्यांनी यावर अतिरेकी वाटावे इतक्या थेटपणे भाष्य केले. दुसर्‍या बाजूला हिलरी सौदीतून जाऊन मदत घेऊन आल्या होत्या. दहशतवाद आणि सौदीचे नाते जगजाहीर आहे. मात्र, स्वत: हिलरी, त्यांचे पाठीराखे व माध्यमे यांना यात फारसे काही वावगे वाटले नाही. त्यांच्या निवडणूक मोहिमेसाठी मिळालेल्या मदतीभोवती यामुळे संशयाचे जाळे निर्माण झाले होते. ’आपण या भूमीशी निगडित आहोत आणि तिच्या रक्षणासाठी आपल्याला जे काही करावे लागेल ते आपण केले पाहिजे,’ असा ट्रम्प यांचा खाक्या होता. हे अत्यंत साधे, सोपे आणि सुटसुटीत होते. सुंदर शब्द शोधून उत्तमभाषण करून मूल्यांचा जयघोष करायचा आणि वागण्यात त्याच्या अत्यंत विपरीत वागायचे हे ‘हिलरी मॉडेल’ लोकांना आवडले नाही. माध्यमांचा बधीरपणा इतका की, त्यांच्याही लक्षात ही बाब आली नाही. त्यांनाही ट्रम्पद्वेषाची कावीळ झाली होती. व्यक्ती म्हणून ट्रम्प कसेही असले तरी उमेदवार म्हणून ते देशाच्या हिताचेच मुद्दे उपस्थित करीत होते.

 माध्यमांचे हे जनमताशी तुटलेपण चिंतेची बाब आहे. अन्य कुणासाठी नव्हे, तर माध्यमांसाठीच ती धोक्याची घटना आहे. एका बाजूला सर्व्हे वगैरेंचे विज्ञान भविष्य वर्तविण्यासाठीचे महत्त्वाचे आयुध म्हणून पुढे येत असताना जनमताचा थेट रोख ध्यानात येऊ नये, ही खरोखरच विचार करायला लागणारी गोष्ट आहे. बौद्धिक अहंकार हा यातला प्रमुख मुद्दा आहे. न पचवता आलेल्या मानवी मूल्यांची पोपटपंची करून लांगुलचालनाचा वेगळा अध्याय माध्यमे लिहीत आहेत. ट्रम्पची जशी चेष्टा झाली तशी चेष्टा करणार्‍यांची जमात आपल्या माध्यमांतही मोठी आहे. देशभक्तीचा किंवा या भूमीशी संबंधित कोणताही विषय टोकदारपणे मांडणार्‍यांची कुचेष्टा करणार्‍यांच्या टोळ्या आपल्याकडेही आहेत आणि त्या चांगल्याच सक्रिय आहेत. देशाशी संबंधित काहीही मुद्दा मांडला की, त्यांना ‘भक्त’ वगैरे म्हणून हिणविण्याची फॅशन आली आहे. मुद्द्यापेक्षा त्याच्या मांडण्याच्या पद्धतीवर हल्ला करायचा आणि विषय निकालात काढायचा, असा हा डाव आहे. एकदा का आपण चॅनलवर वगैरे जाऊन वटवट करण्यात नैपुण्य मिळविले की, अन्य लोकांना निकालात काढण्याचे, वाट्टेल ते बडबडण्याचे लायसन्सच आपल्याला मिळून जाते. या बडबडीवर कुणी साधा आक्षेप घेतला की, तो ‘माध्यमस्वातंत्र्यावर हल्ला’ असे म्हणून भरपूर कांगावा करायचा. याच गुंगीत आणि नकारात्मकतेच्या अफूत आपले माध्यमवीर भटकत आहेत. मराठीतील एका संपादकाने टाटांना असेच ’दैवत्व’ बहाल केले आहे. त्यांच्या लेखी टाटा ’मूल्यांचा पुतळा’ आहेत. सिंगूरमध्ये जे घडले त्यावर टाटांनी चकार शब्दही काढला नाही. नीरा राडिया टेप प्रसिद्ध होऊ नये म्हणून त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली होती. मिस्त्री राजीनामा नाट्यानंतर टाटांच्या बाबतीत उपस्थित होऊ शकतील, असे अनेक प्रश्न आहेत. शहाणी माणसे अशा वेळी गप्प राहतात, पण हे महाशय तर आताही आरती ओवाळायच्या नादातून बाहेर पडायला तयार नाहीत. नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाबाबतही राहुल गांधी आणि समकक्ष बुद्धिवंतांचे असेच समान आक्षेप आहेत. वस्तुत: काळ्या पैशाचा प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की, तो निकालात काढण्यासाठी काही वेळ लागणारच; पण लगेचच पंतप्रधानांच्या हेतूविषयीच शंका व्यक्त करायचे उद्योग सुरू झाले. इतकी नकारात्मकता ही मंडळी कुठून आणतात हाच खरा सवाल आहे. काही केल्या आपल्याच विचारांची गुंगी तुटायचे कारण नाही. यांचे दोन्ही खांदे धरून यांना थोडे हलविले पाहिजे; अन्यथा पुढच्या काळात काही खरे नाही.

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.