वळू आणि देऊळ या चित्रपटांची आजही एकप्रकारे मराठी रसिकांवर मोहीनी आहे. ‘वळू’ने मराठीत एक वेगळा प्रयोग करीत प्रचंड लोकप्रियता मिळविली आणि याच लोकप्रियतेच्या जोरावर उमेश व गिरीष कुलकर्णीचा पुढचा सिनेमा म्हणजेच ‘देऊळ’ रसिकांनी प्रचंड उचलून धरला. एवढच काय देऊळला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. हेच गारूड उराशी बाळगत ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’कडे त्याच अपेक्षेने पाहणारे महाराष्ट्रात आज लाखो रसिक आहेत. पण ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’मधून गिरीषने लिखाणाबरोबरच दिग्दर्शनातही साफ निराशा केली आहे. त्याचा अभिनय अखेरपर्यंत बघतच राहावासा वाटतो, पण पटकथेत, मांडणीत आणि संवादातही काहीच दम नसल्याने प्रेक्षक अखेर “जाऊंद्या ना ‘घरी’ बाळासाहेब’’ असं म्हटल्याशिवाय राहात नाहीत.
ग्रामीण भागातील विषयांवर कथा लिहून त्यावर चित्रपट निर्मिती करण्याकडे कुलकर्णींचा अधिक भर असतो. मागील दोन अनुभवांमध्ये गोष्ट वेगळी होती. वळू आणि देऊळची कथा गिरीषनी अतिशय संवेदनशील पद्धतीने लिहीली, त्यात मुख्य भुमिकाही साकारली मात्र यात दिग्दर्शनाची जबाबदारी उमेशने बजावली होती. ‘जाऊंद्या ना’मध्ये मात्र गिरीषने कथा व संवाद लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या भूमिका एकट्यानेच पार पाडल्याने कदाचित सगळीच खिचडी झाली आहे. अर्थात याही चित्रपटाचा विषय ग्रामीणच आहे. पुण्याजवळील एका गावात माजी आमदाराचा मुलगा असणार्या ‘बाळासाहेबां’ची ही कथा. खरतर विषय खुपच वेगळा होता. राजकीय घराण्यात वावरणार्या या बाळासाहेबाला राजकारणात मुळीच रस नाही. दारू पिणं, नाचणार्या बाईकडे बसणं, गाड्या फिरवणं आणि पुणे शहरात बिनकामाचं हिंडत राहणं हेच या बाळासाहेबाचं आयुष्य. अशातच एकदा पुण्यातील सुदर्शन रंगमंचामध्ये नाटक बघत असताना त्याची गाठ उर्मीशी पडते आणि तिथूनच त्याचं आयुष्य वेगळ्या वळणाच्या प्रवासाला लागतं. या बाळासाहेबाचे आई-वडील, दोन मित्र जीवन आणि विकास, बालमैत्रीण करिष्मा, आणि नाटकावाली उर्मी या मुख्य पात्रांभोवती चित्रपट घोंघावत राहतो.
‘अरे डॉल्बिवाल्या बोलावं माझ्या डीज्जेला’ या धडाकेबाज गाण्याने चित्रपटाची सुरूवातही तितकीच धडाकेबाज होते. गाण चालू असतानाच ‘सादी एक्टींग- गिरीष कुलकणी, सई ताम्हणकर’, ‘स्पेशल एक्टींग-मोहन जोशी, रीमा’, ‘मालक-अजय-अतुल, गिरीष-उमेश कुलकर्णी’ ‘मुख्य मालक-पुनम शेंडे’ असे नावांमध्येही वेगळेपण दिसल्याने पुढे साधारण सव्वादोन तासही ‘हटके’ काहीतरी बघायला मिळेल अशी आशा आपसुकच निर्माण होते. पण अक्षरश: पहिल्या सीनपासून अखेरच्या अर्ध्यातासापर्यंत चित्रपट प्रेक्षकांवर पकडच मिळवत नाही. एखादा विनोदी सीन येतो, आपल्याला हसवून जातो, त्यानंतर एखादा चांगला सीनही दिसतो आणि आपल्याला वाटतं आता खरा चित्रपट सुरू होतोय पण पुढच्याच सीनला गाडी पुन्हा रूळावरून खाली घसरते. अनेक गोष्टींची मांडणी अशा पद्धतीने का केली असावी याचं लॉजिकच लक्षात येत नाही. वडीलांच्या पैशांवर मैजमजा करण्यापेक्षा स्वत:चं काहीतरी अस्तित्त्व निर्माण कर, समाजकार्य कर, मित्राला नाटक निर्माण करण्यात मदत कर असा सल्ला उर्मी बाळासाहेबाला देते आणि आपले बाळासाहेब तो सल्ला मनावरही घेतात. मग काय पुढील बराच काळ या नाटक निर्मितीत, पाठांतरात, व्यायामात व राजकीय घडामोडींमध्ये जातो. पण यातून नक्की लेखकाला किंवा दिग्दर्शकाला काय दाखवायचयं हे रसिक अखेरपर्यंत शोधतच राहतो. चित्रपटाच्या शेवटी ‘वाट दिसू दे रे देवा वाट दिसू दे...’ हे अतिशय सुंदर गाणं आहे. किमान अखेरीस तरी दिग्दर्शकाला वाट मिळाली याचा आनंद मानून आपल्याला चित्रपट गृहाच्या बाहेर पडावं लागतं. चित्रपटाला जो संदेश द्यायचा आहे तो अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होतो. पण या संदेशाची छोटी-छोटी झलक मध्ये मध्ये काही सीनमधून दाखविली असती तर चित्रपट अधिक चांगला बनू शकला असता.
देऊळमधल्या अभिनयाबद्दल गिरीषला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘जाऊंद्या ना’मध्येही त्यानी त्याच दर्जाचा अभिनय केला आहे. व्यसनांमध्ये मशगुल असलेला बाळासाहेब आणि नाटकाच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी मांडणी करू पाहणारा बाळासाहेब या एकाच व्यक्तिरेखेच्या दोन्ही बाजू त्याने अत्यंत सक्षमपणे साकाराल्या आहेत. सईनेही ग्रामीण भागातील युवती साकारताना जीव ओतून काम केल्याचे दिसते. खरतर तिच्यासाठी अशा भूमिका थोड्या अवघड आहेत, पण ‘वायझेड’ नंतर लगेचच ‘जाऊंद्या ना’ मधून पुन्हा एकदा सोज्ज्वळ भूमिका मिळाल्याने आता याचीही तिला सवय झाली असेल. बाळासाहेबांच्या मित्राच्या भूमिकेत असणारे किशोर चौघुले व श्रीकांत यादव यांना चित्रपटात भरपूर वाव मिळाला आहे आणि त्यांनीही त्याला योग्य न्याय देत अव्वलच काम केलयं. मोहन जोशी, रीमा लागू यांच्यासारख्या ज्येष्ठांचं चित्रपटात असण हेचं मोठ बलस्थान आहे. याशिवाय भाऊ कदम, मनवा नाईक, दिलीप प्रभावळकर यांचे कामही छान!
बर या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये होते, ते म्हणजे सैराट गाजवणार्या अजय-अतुलचं संगीत. या दोघांनी कितीही नाकारलं तरी ‘जाऊंद्या ना’मधली काही गाणी (ब्रिंग इट ऑन, वाट दिसू दे, गोंधळ, डॉल्बिवाल्या) ऐकताना याची चाल, संगीत आधी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं आणि यामुळेच हे वैशिष्ट्यही गळून पडतं. सोनु निगम, कुणाल गांजावाला, श्रेया घोशाल यांच्यासारख्या दिग्गजांनी ‘मोना डार्लिंग’ या गाण्याला आवाज दिला असला तरी गाण्याचे बोल लक्षात राहात नाही आणि शिवाय ते गाणं जरा जास्तचं लाऊड झाल्यासारखं वाटतं. संपूर्ण चित्रिकरण पुणे शहर, जिल्हा आणि परिसरात झालं असल्याने त्यातील बरीचं ठिकाणं आपल्या ओळखीची वाटतात. बाळासाहेबाच्या जुन्या वाड्यावर निम्म्याहून अधिक चित्रिकरण झालं आहे, त्यामुळे यातही काही नावीन्य दिसून येत नाही. आत्ता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्यामुळे ‘बाळासाहेब’ चित्रपटगृहात जाऊन बघायचे का नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या!