कारागृहातील कैद्यांच्या कष्टाच्या कमाईला सर्वांचीच दाद
वेगवेगळ्या गुन्हांसाठी सजा मिळालेले कैदी तुरुंगात जातात. त्यांची ठराविक वर्षांची सजा भोगतात. यादरम्यान आपल्याला त्यांची ओळख असते ती केवळ एक गुन्हेगार, शिक्षा भोगणारा कैदी. शिक्षा सुनावल्यानंतर गुन्हेगार एकदा तुरुंगात गेला की मग आपल्याला त्याच्याशी काही देणं-घेणं राहत नाही. तुरुंगात कधीतरी कोणा कैद्याची आत्महत्या, खून, मारामारीच्या बातम्या आपण पाहतो इतकंच. तुरुंगात हे कैदी काय करत असतात याबद्दल आपण पुष्कळदा अनभिज्ञच असतो. ते काय करत असतात याचं उत्तर गेले दोन दिवस मंत्रालयात भरवण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनातून मिळतं आहे.
राज्याच्या विविध मोठ्या कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे विक्री व प्रदर्शन महाराष्ट्र कारागृह विभागातर्फे यावेळेस भरवण्यात आलं आहे ते थेट राज्याचं राजकीय, प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालयात. मंत्रालयाच्या मुख्य आवारात विविध स्टॉल्सवर या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये कपडे- शर्ट, कुर्ते, टॉवेल, रुमाल, चादरी, बेडशीट, लाकडी वस्तू, खुर्च्या, अन्य फर्निचर, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, साबण, पर्स, चपला, आकाशकंदील, अशा असंख्य वस्तू आहेत. एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी एक-दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराने या वस्तू बनवल्या आहेत यावर सर्वसामान्य माणसाचा विश्वासच बसणार नाही इतक्या त्या सुंदर व दर्जेदार आहेत.
CM @Dev_Fadnavis visits exhibition at Mantralaya, of goods made by jail inmates.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2016
Inmates from 10 different jails made 257 types of products. pic.twitter.com/sox3g07sRB
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातर्फे ठाणे, नाशिक, पुणे (येरवडा), औरंगाबाद, अमरावती अशा सर्व मोठ्या तुरुंगांतर्फे मोठ्या स्तरावरचे व मंत्रालयाच्या मुख्य आवारात भरवलेले असे हे पहिलेच प्रदर्शन आहे. एडीजी (ऍडिशनल जनरल ऑफ पोलीस) भूषणकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला आहे. या प्रदर्शनात मंत्रालयातील अगदी मंत्र्यांपासून ते विविध अधिकारी, येणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, विविध कामं घेऊन मंत्रालयात येणारे सर्वसामान्य लोक अशा साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं जातं आहे. काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथे भेट दिली. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे तुरुंगाच्या आतही एक स्वतंत्र विश्व असतं, जिथे केवळ मारामाऱ्या करणारे अट्टल, भावनाशुन्य गुन्हेगारच राहत नाहीत तर अत्यंत सुंदर, दर्जेदार वस्तू बनवणारे कलाकारही राहतात हे समाजाला समजण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक वस्तू, त्या त्या वस्तूच्या वर्गीकरणानुसार बनवण्यासाठीचा लागणारा काळ गृहीत धरून कैद्याला एक टास्क दिला जातो. कैद्यांतील कुशल कामगाराला प्रत्येक टास्कचे उदा. एक शर्ट शिवल्यास ५५ रुपये, मध्यम कुशल कामगाराला ५० रुपये, व अकुशल कामगाराला ४० रुपये दिले जातात. या प्रदर्शनातील वस्तूंमध्ये कच्चा माल आल्यानंतर बनवण्याचं पुढील सर्व काम या कैद्यांनी केलेलं आहे. यातून तुरुंगात कैद्याकडून चांगलं काम होत, त्यातून त्याची कमाई होते, त्याचा वेळ जातो आणि स्वतः कष्ट करून कमाई केल्याने गुन्हेगाराच्या मानसिकतेतून बाहेर येण्यास आधारही मिळतो, असे कारागृह विभागाचे संपर्क अधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले. या वस्तूंच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नातून नाममात्र ११ टक्के उत्पन्न शासन स्वतःकडे ठेवतं बाकी सर्व कैद्यांना त्यांची कमाई म्हणून दिलं जातं अशी माहिती पाटील यांनी दिली.
विभाग स्तरावरील मोठ्या कारागृहांच्या परिसरात कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंची दुकाने आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांना एकतर याबद्दल माहिती नसते, किंवा त्यांना त्याबद्दल निरुत्साह वाटतो. मात्र अनेक शासकीय कार्यालये आदींमध्ये फर्निचर, अन्य वस्तू, पोलिसांचे युनीफॉर्म, कैद्यांचे युनीफॉर्म हे सर्व तुरुंगातील कैद्यांनी बनवलेलं असतं याची बऱ्याचदा कल्पना नसते. प्रत्येक गुन्हेगारामध्ये एक संवेदनशील माणूस दडलेला असतो आणि त्याच्यातील जिद्द, कष्ट करण्याची वृत्ती, कला अशा उपक्रमांमधून बाहेर येऊ शकते याचं मंत्रालयात भरवण्यात आलेला उपक्रम हे उत्तम उदाहरण आहे. आणि कैदी म्हटल्यावर मनात राग, भीती, निरुत्साह बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसासमोर त्याच कैद्यांनी बनवलेल्या सुंदर व दर्जेदार वस्तू आणून ठेवल्यास त्याचाही दृष्टीकोन किंचित बदलू शकतो हेही गेले दोन दिवस या प्रदर्शनाला मिळणाऱ्या प्रतिसादातून सिद्ध होतं आहे.