१०० देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लशीमुळे आम्ही जिवंत!

- देवेंद्र फडणवीस; भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे श्रेय नरेंद्र मोदींना

    27-Apr-2024
Total Views |
Devendra Fadnavis On Narendra Modi

मुंबई
: अवघे जग कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी लसनिर्मितीला प्रोत्साहन दिले. प्रत्येक भारतीयाला लसीचे सुरक्षा कवच देतानाच, जगभरातील गरजवंत देशांना लसपुरवठा केला. त्यामुळे आज १०० हून अधिक देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लशीमुळे आम्ही जिवंत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी केले.
 
सांगली लोकसभेतील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्यांने म्हटले होते की, मोदींना उसाच्या शेतीबाबत, साखर कारखान्यांबाबत काय कळते? मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना नाव न घेता लगावला.

८० लाख बचत गट तयार करून मोदींनी महिलांना स्वतःच्या पायावर उभा केले. दिव्यांगासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही भरीव काम करत असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. जगातील ५ देश दिवाळखोरीत जाणार होते, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नरेंद्र मोदींनी देश आर्थिकदृष्ट्या मजबूत केला. सरकारी व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी केला. २०१३ मध्ये पायाभूत सुविधांवर वर्षाला १ लाख कोटी रुपये खर्च होत होते. मोदींच्या काळात हा खर्च १३ लाख कोटींवर पोहोचल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यंदाची निवडणूक देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची

२०२४ ची लोकसभा निवडणूक देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. कोण देशाचा विचार करेल, देश पुढे नेऊ शकेल, हे ठरवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती, तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.