नवी दिल्ली: मणिपूरमधील नरनसेना भागात कुकी बंडखोरांनी शुक्रवार मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत.हे जवान राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनचे आहेत. मणिपूर पोलिसांनी या हल्ल्याची माहिती दिली असून मध्यरात्री हा हल्ला झाल्याचे सांगितले. मणिपूरमध्ये शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर काही तासांनी हा हल्ला झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी चौकीला लक्ष्य केले आणि डोंगराच्या माथ्यावरून बेछुट गोळीबार केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होता. बंडखोरांनी यावेळी बॉम्बचादेखील वापर केला असून त्यातील एकाचा स्फोट सीआरपीएफच्या 128 बटालियनमध्ये झाला. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा लोकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.